माझ्या व कुटुंबाच्या मागे ईडीचे संकट लावणारेच पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसले…..!
पालकमंत्री हसन मुश्रीफ ..

0 0

Share Now

Read Time:10 Minute, 0 Second

 

कोल्हापूर प्रतिनिधी, १६ .

माझ्या आणि कुटुंबाच्या मागे ईडीसह खोट्या कारवाया लावून छळ करणारे शरद पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना दहा वर्ष मांडीवर घेतले होते तिथे ते घाण करून आलेत. पवारसाहेबांच्या मांडीवरही ते घाणच करणार आहेत, असा घनाघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांचे नाव न घेता केला.         

गडहिंग्लजमध्ये म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर श्री. मुश्रीफ व आमदार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट जाहीर प्रचारसभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.     

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, विरोधी उमेदवार निष्ठेच्या गप्पा मारत आहेत. गेली ३५ वर्ष शरद पवारसाहेबांच्या मागे उभा राहिलो. गुरुदक्षिणा म्हणून त्यागाच्या रूपाने फुल ना फुलाची पाकळी दिली. परंतु; दहा वर्षे देवेंद्र फडणवीस याचा त्यांनी फायदा घेतला. सत्तेचा वापर करून कज्जे दलाली केली. ज्यावेळी सत्वपरीक्षा द्यायची वेळ आली, त्यावेळी सत्तेच्या लालसेपोटी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळून गेले.   

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, सिद्धनेर्लीच्या दलित समाजाच्या जमिनी काढून घेणारा, संजय गांधी निराधार योजनेची चौकशी लावून वृद्ध, दिव्यांग, विधवा, परित्यक्त्या निराधार लाभार्थ्यांच्या चुलीत पाणी ओतणारा, बांधकाम कामगारांच्या चुलीत पाणी ओतणारा अशा या विरोधकाला खड्यासारखे बाजूला फेका. आम्हाला पुन्हा संधी द्या. संपूर्ण आयुष्यभर जनतेची हमाली करू. मी आणि राजेश पाटील तुमच्या जीवनात चांगले दिवस आणू, असेही ते म्हणाले.

आमदार राजेश पाटील म्हणाले, माझ्या मतदारसंघात साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी फक्त मुश्रीफ यांच्यामुळेच मिळाला. त्यांच्या पाऊलवाटेवरून वाटचाल करीत करीत मतदारसंघाचा कायापालट केला. चंदगडचा उमेदवार नंतर नंतर बाभुळकर बालिश भाषण करीत आहेत

संयमी सुशिक्षित उमेदवार ही चंदगड ची ओळख आहे या मतदारसंघात भाईगिरी चालू दिलीच नाही. आता ताईगिरी सुद्धा चालू देणार नाही.   

राजेंद्र गड्यानवार म्हणाले, गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे नेतृत्व म्हणजे पालकमंत्री मुश्रीफ. श्री. मुश्रीफ फक्त कागलचेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याचे पालक

कारखान्याचे नुकसान तुम्हीच केलं….डॉक्टर शहापूरकर साहेब तुमच्या ५५ कोटींचा हिशोब लवकरच होणारच

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, मी आयुष्यभर संघर्ष करत आलोय. मुश्रीफांशी राजकीय लढाई लढलो.. पण या संघर्षात एक प्रामाणिकपणा ठेवला कारखाना काढण्यासाठी अडीच वर्ष रस्त्यावर होतो पण एका क्षणात माझा तो प्रवास मुश्रीफांनी यशस्वीरित्या संपवला..    

अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, आयुष्यात पहिल्यांदाच एवढी मोठी सभा पाहण्याचे भाग्य मिळाले. मंत्री मुश्रीफांनी प्रचंड मोठा विकास केलाय याचा राज्यात गाजावाजा आहे. अनेक दिवस प्रचारात फिरतोय अजित पवारांचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. विविध जाती धर्माची हजारो लोक या ठिकाणी मुश्रीफांना समर्थन देण्यासाठी जमलेत, हेच त्यांच्या आजवरच्या जातीपातीच्या पलीकडच्या कार्याचं यश म्हणावं लागेल.          

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, गोरगरीब दिन-दलीत वंचित उपेक्षितांचा आधार बनण्याचं काम फक्त श्री. मुश्रीफच करू शकतात. मंत्री हसन मुश्रीफ हे लंगड्याचा पाय, आंधळ्याचा डोळा, सर्वसामान्यांचे आधारवड आहेत… अशा नेत्याच्या पराभवासाठी शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याला बोलवावं लागतं यातच मुश्रीफांचा विजय आहे. काँग्रेसने ८४ वेळा संविधानात बदल केला. मात्र; पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापूर्वी संविधानाला नतमस्तक झाले. दलित समाजाला प्रेम आणि आदर फक्त मंत्री मुश्रीफ देऊ शकतात. विरोधी उमेदवार समरजीत घाटगेची भूमिका मागासवर्गीय विरोधी आहे.      

सिद्धार्थ बन्ने म्हणाले, विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत म्हणून विनाकारण बेछूट आरोप करण्याचे काम सुरू आहे.

गडहिंग्लज मधील मुश्रीफांच्या शिलेदारांवर बिनबोभाट आरोप करण्याचे काम सौ. स्वाती कोरी करत आहेत. आपल्यासह आपल्या पतीची कुंडली तयार आहे. समाजभान राखून काही गोष्टी उघड केल्या नव्हत्या. पण; आता ती वेळ आली आहे.       

आईशप्पथ….. रेकॉर्डब्रेक सभा…..!

श्री. मुश्रीफ भाषणाला उभे राहताच म्हणाले, आईशप्पथ…. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील गेल्या १५ वर्षात या क्रीडांगणावर लोकगंगेला आलेला महापूर पाहिल्यानंतर मी भारावून गेलो. या रेकॉर्ड ब्रेक सभेला मी सलाम करतो. यावेळची ही ऐतिहासिक विधानसभा निवडणूक सर्व जनतेनेच हातात घेतली असल्यामुळेच माझा व आमदार राजेश पाटील यांचा विजय अधिक सुकर झाला आहे.        

शंका असल्यास काळभैरी मंदिरात या….!

श्री. मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १२७ कोटींचा निधी दिला. याबद्दल कोणाला शंका असेल तर काळभैरीच्या मंदिरात शपथ घेऊया. पुस्तक काढून काम दाखवणे हे हिम्मतीच काम आहे. गेल्या अडीच वर्षात महायुतीच्या सरकारने प्रचंड लोकोपयोगी योजनांचा धडाका लावला.      

तुम्ही सांगाल ते ऐकेन……!

श्री. मुश्रीफ म्हणाले, ७००० कोटी रुपयांचा उच्चांकी विकास निधी या मतदारसंघात आणून विकास केला आहे. याबाबतची पुस्तिकासुद्धा हिमतीवर काढून विरोधकांच्याही घराघरात पोचवली आहे. यातील एकही काम चुकीचे असेल तर तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. 

मला क्लीन चिट… पवारसाहेबांना भेटून सांगणार….

श्री. मुश्रीफ म्हणाले, देशाचे नेते शरद पवारसाहेब हे आमचे दैवत होते, आहेत आणि राहतील. त्यांनी कालच्या गडहिंग्लजच्या सभेत ईडीची फाईल अजून मिटलेली नाही. ती टेबलवरून कपाटात नेऊन ठेवलेली आहे, असे म्हणालेत. परंतु; मला क्लीन चीट मिळालेली आहे. त्यांना ते कदाचित माहिती नाही.. मी त्यांना भेटुन याची माहिती देणार आहे..      

यावेळी दत्ताजीराव देसाई मधुकर पाटील, राजेंद्र तारळे, संदीप नाथबुवा, किरण कदम, गुंडुराव पाटील, राजेंद्र गड्डयांवर यांनी मनोगत व्यक्त केले.                 

व्यासपीठावर आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, भाजप कागल तालुका अध्यक्ष परशुराम तावरे, भाजप गडहिंग्लज अध्यक्ष राजेंद्र तारळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, गडहिंग्लज कारखाना अध्यक्ष प्रकाश पठाडे, केडीसी बँक संचालक संतोष पाटील, सिद्धार्थ बन्ने आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत महेश सलवादे यांनी केले. अमर मांगले यांनी आभार मानले.

  

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *