मिरज दि. 22 मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी आणू, असे अश्वासन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी यांनी दिले. मिरजेत जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर ते बोलत होते.
जनसुराज्य शक्ती पक्ष सांगली जिल्हा यांच्या वतीने गणेश तलाव सुशोभीकरण आणि स्वच्छ्ता मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून गणेश तलावामध्ये मासे मृत्युमुखी पडत आहेत. गणेश तलावाच्या स्वच्छता व सुशोभीकरणाचा प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित असल्याने सांगली जिल्हा संघटक सलीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी गणेश तलाव येथे आंदोलकांची भेट घेऊन नागरिकांच्या आणि आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. समित कदम यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी फोन वरून संपर्क साधला.
गणेश तलाव स्वच्छता आणि सुशोभीकरण याबाबत चर्चा केली. महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन मंत्री यांच्याकडून गणेश तलाव सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती यावेळी समित कदम यांनी दिली. यावेळी महादेव कुरणे, अनुसूचित जाती जमाती शहर उपाध्यक्ष शेखर लोंढे, आक्रम गाझी, अमीर पठाण, दर्शन कांबळे, योगेश दरवंदर, चेतन कलगुटगी, विशाल शिरोळे, युनूस पठाण, सुहास गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.