Getting your Trinity Audio player ready...
|
Media control news network
सध्याच्या युगात प्रचंड स्पर्धा आहे. अशा वेळी दर्जेदार शिक्षणाबरोबर, संस्कार आणि कलागुणांची जोपासना आवश्यक आहे. शिक्षकांनी नवी पिढी घडवण्यासाठी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, त्यातून भविष्यात भारत देश जागतिक पातळीवर महासत्ता बनेल, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील प्रवेशोत्सव उपक्रम वडणगेमध्ये राबवण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नव्या शैक्षणिक वर्षात, शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी १०० शाळांना भेटी देणे, असा निर्णय बैठकीत घेतला आहे. या उपक्रमांतर्गत खासदार धनंजय महाडिक यांनी, सोमवारी करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या शिवाजी विद्या मंदिर आणि कन्या विद्या मंदिर या शाळांना भेट दिली.
ढोल ताशांच्या गजरात आणि हलगीच्या कडकडाटात लेझीम नृत्य सादर करत, पारंपारिक वेशभूषेत आलेल्या मुलांचं शाळेच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी गुलाब पुष्प देवून प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वागत केले. त्यानंतर खासदार महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते, विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वाटप करून, वृक्षारोपण झाले.
अशा उपक्रमातून शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक होईल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. तसेच नवी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते असे सांगून, देशाला महासत्ता बनवण्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. दरम्यान वडणगेच्या सरपंच संगीता पाटील यांनी सरकारी शाळेत प्रवेश विद्यार्थ्यांच्या परिवाराला घरफाळा आणि पाणीपट्टी मध्ये सवलत देण्याचे जाहीर केले.
यावेळी उपसरपंच उमाजी शेलार, बाजीराव पाटील, तानाजी पाटील, एम. बी. किडगावकर, इंद्रजित पाटील, सर्जेराव पाटील, कृष्णात जौंदाळ, बाबासाहेब पाटील, चिखलीचे सरपंच रोहित पाटील यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.