नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र साडी महोत्सव, विणकाम वारसा आता देशाच्या राजधानीत

 

नवी दिल्ली,५: भारतीय संस्कृती आणि वस्त्रांचा अनमोल वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातील विणकरांच्या कलेला दाद देण्यासाठी आणि राज्याचा गौरवशाली हातमाग वारसा साजरा करण्यासाठी, नवी दिल्लीतील  महाराष्ट्र सदन येथे भव्य महाराष्ट्र साडी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत कस्तुरबा गांधी मार्ग  येथील महाराष्ट्र सदन येथे हा सोहळा रंगणार असून, यामध्ये महाराष्ट्राची शान असलेली पैठणी, औरंगाबादचे प्रसिद्ध हिमरू, खण, नारायणपेठी, हॅन्ड पेंटेड साडी यांसह इतर अस्सल हस्तकला कापडांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

या महोत्सवाचा मुख्य उद्देश राज्यातील विणकर आणि कारागीर समुदायासाठी व्यापक प्रसिद्धी आणि बाजारपेठेतील नवीन संधी निर्माण करणे हा आहे. या महोत्सवांतर्गत २१ मार्च २०२६ रोजी एका विशेष फॅशन शोचे देखील आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेला आधुनिक व्यासपीठ मिळणार आहे. या फॅशन शोच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार असून, यामुळे उपस्थित विणकर आणि सहभागी कारागिरांना मोठी प्रेरणा मिळणार आहे.

Advertisements

 सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले असणाऱ्या या प्रदर्शनात ग्राहकांना थेट विणकरांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे साड्यांच्या शुद्धतेची खात्री आणि रास्त दर मिळण्यास मदत होईल. आधुनिक काळातील महिलांच्या आवडीनुसार पारंपरिक विणकामाला नव्या डिझाईन्सची जोड देऊन येथे विविध साड्यांचे प्रकार मांडले जाणार आहेत. दिल्लीतील साडी प्रेमींनी आणि नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन महाराष्ट्राच्या या समृद्ध वारशाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन  महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *