Getting your Trinity Audio player ready...
|
हरवले ची तक्रार!
—————————————————-
सोमवार विशेष दिनांक १८/१०/ २०२१
—————————————————
लेखक : श्री शिवाजी तुकाराम शिंगे
—————————————————-
आठवड्याचा पहिला सोमवारचा तो दिवस. तालुका ठिकाणच्या पोलीस स्टेशनला चाळीशी ओलांडलीला एक माणूस पोलीस स्टेशनची पायरी चढून कुठल्याशा एका कोपऱ्यात उभा राहिला!
आठवड्याचा पहिला दिवस असल्याने पोलीस स्टेशनमध्ये अनेकांची सकाळी सकाळी धावपळ सुरू होती.डोक्यावरती पांढरी टोपी अंगावरती पांढरा कुर्ता विजार घातलेला तो माणूस मध्यम बांध्याचा साडेपाच फूट उंचीचा व सरळ नाकाचे दांडी चा तो माणूस तिथेच एका कोपऱ्यात उभा राहिला.
बराच वेळ आवासून उभा राहिल्याने जवळच्याच एका नव्याने भरती झालेल्या तरण्याबांड ‘चपट्या नाकाच्या’
मिशा फुटायच्या अगोदरच मिसरूड काढलेला पोलीस कॉन्स्टेबल खान नावाचा एखादं “वार” आलं की उडून
जाईल, इतक्या हलक्या शरीराचा असणाऱ्या कॉन्स्टेबलने त्या माणसाच्या शेजारी जात
त्याने आपल्या पोलिसी भाषेत त्याला विचारलं,
कोण आहे तुम्ही काय काम आहे तुमचं.
त्या माणसाने उत्तर दिलं मला फौजदार साहेबांना भेटायचं!
व्हय नाही व्हय म्हणत त्याने आत मध्ये जाऊन साहेबांना एक माणूस भेटायला आलेला आहे अशी ‘वर्दी’ दिली.आणि उभ्या उभ्याच फौजदार साहेबांनी लांबून त्याला विचारले काय काम आहे तुमचं?एक हरवल्याची तक्रार द्यायचे साहेब!फौजदार बर मग,फौजदार साहेबांनी हवालदाराकडे बघत हेड कॉन्स्टेबल तथा
ठाणे अंमलदार सावंत कडे जाण्याचा इशारा केला.
तक्रारदार त्याच्यामागोमाग ठाणे
अंमलदारच्या टेबल समोर जाऊन उभा राहिला.
ठाणे अंमलदार सावंत साहेबांची सेवा, निवृत्तीच्या वाटेवरची दोन वर्षे अवधी शिल्लक राहिली होती.गाव गाड्यावर चा बारकाईने अभ्यास करणारा पोलीस स्टेशनमधील अनुभवी माणूस म्हणून अनेक जण त्यांच्याकडे पाहत असे.समोरच्या तक्रारदार माणसाला सावंत
साहेबांनी खुर्चीवर बसण्याचा इशारा केला.
सागवानाचे लाकडाचे असणार ते टेबल, टेबलावरती सावंत साहेबांची नेहमीप्रमाणे असणारी लांबसडक सागवानी काठी,
अन टेबलावर ठेवलेली निळ्या रंगाची डोक्यावरची टोपी,सावंत साहेब बसलेल्या सागवानी लाकडी खुर्ची वरती एका पायाची घडी दुसऱ्या पायावर ती करून शांतपणाने आलेल्या माणसाचे निरीक्षण करत होते.
पोलीस खात्यातील बुजुर्ग आणि अनुभवी माणूस असल्याने सावंत साहेबांनी दोन कप चहा मागून घेतला आणि विषयाला हात घालायला हळूहळू सुरुवात केली.
बोला नाव काय तुमचं?मला निनावी तक्रारी द्यायची आहे.बर बोला पुढे काय तक्रार आहे तुमची? हरवल्याची तक्रार आहे साहेब!
बर बोला कोण हरवलय!
आणि अचानक समोरचा माणूस एकदम “निशब्द” झाला दाटून आलेला’ हुंदका’ डोळ्यावाटे टिपटिप पडणारा त्याचं अश्रूंचे थेंब ठाणे अंमलदार साहेबांना क्षणभर गहिवरून आल्यासारखं वाटल.
काही वेळ नीरव शांतता पसरली डोळ्यातून पडणाऱ्या अश्रूंना मोकळी वाट मिळाल्याने आता त्याचं मन थोडं हलकं झालं होतं.
हो हरवलेय साहेब,”माणूसपण” हरवलेय.
“माणूसपण” हरवलंय साहेब.
सावंत साहेबांनी हाताची घडी करून एकटक नजर लावुन ऐकायला सुरुवात केली.
“माणूसपण” हरवलंय खर आहे साहेब.
मला याची एक तक्रार द्यायचे आहे.
माणूस माणसापासून दूर होत चाललेला आहे. त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेणे खूप कठीण झाल आहे.रक्ताची नाती डागाळलेली आहेत.
पैशाच्या मागे लागणारी प्रवृत्ती वाढू लागली आहे.माणसाचं “माणूसपण”बाजारात कवडीमोल दराने विकू लागलेला आहे.
गरीब आणि श्रीमंतिच्या या मधल्या दरी मध्ये “माणूसपण” हरवत चाललेल आहे.
उसाच्या शेतामधील जास्तीच्या राहणाऱ्या
‘रान’ असणारी भांगलली जाणारी,
सरी जशी भांगलण झाल्यावरती पीक
जोमात येते अगदी तशीच “भांगलण” माणसाच्या “माणूसपणाची” का केली जात नाही?हा माझा प्रश्न आहे साहेब!
आणि क्षणभर सावंत साहेब निरुत्तर झाले!
बेरोजगारांना रोजगार दिला जात नाही! जास्तीची शाळा शिकलेली तरणीबांड पोर नोकरी अभावी लग्ना वाचून ताटकळत आवासून उभारलेली आहेत.
पिढी दर पिढी चा कर्जाचा साठलेला डोंबाळा त्याच्या हाताला काम मिळत नसल्याने तसाच पुढे पुढे वाढू लागला आहे.
नांदायला गेलेली लेक सहा महिने व्हायच्या आत अंगावरची पिवळी झालेली हळद घेऊन कायमची घराकडे परत आलेले आहे,पुन्हा कधी सासरला न जाण्यासाठी.
न चुकता गावातून दर दिवशी गल्ली गल्लीतून फेरी मारणारमारणारा तो बुलेट वाला खाजगी सावकार पांडबा,दारातुन जाणार्या त्याच्या बुलेटचा ठोका ऐकला की काळजात धस झाल्यासारखं होतंय.
शेतातल्या पिकाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने सेवा सोसायटीचे काढलेले कर्ज फिटता फिटेना झालेय.
आठवड्याच्या दर सोमवारी न चुकता दारात येणारा बचत गटाचा तो साहेब हप्ता वसूल केल्याशिवाय जागेवरून हलत नाही.
गावातल्या पंचायत ला निवडून जाणार्या माणसाला मतदान केलं म्हणून पडणाऱ्या माणसाने शेतातले पाणी सहा महिने झाले बंद केल आहे साहेब.
गेली दोन वर्षे घराचा “घरफाळा” न भरल्याने घरातल्या दोन तांब्याच्या घागरी पंचायतीच्या ग्रामसेवकाने जप्त करून नेऊन ठेवले आहेत. गावातला पोस्टमन न चुकता दर पंधरा दिवसाला बँकेच्या थकबाकीच्या हप्त्याची नोटीस हातात आणून टेकवत आहे.
कधीकधी त्या नोटिशीचा मजकूर घराची जप्ती करण्याची धमकी देत आहे.
दोन महिन्यापूर्वी अचानक लाईट वाला वायरमेन याने घरातली अचानक लाईट,बिल न भरल्याने तोडून टाकले आहे.अंधारलेल्या घरात महाग झालेल्या रॉकेलचा दिवा पेटत आहे.हे सारं मला सहन करावं लागतंय.
“माणूसपण”विकलेल्या बाजारात मला माझं मन पुन्हा पुन्हा धुंडाळू लागलय.
एका बाजूला कोटीची उड्डाणे घेणाऱ्या
श्रीमंत अवलादी,हजारो एकराचे शेत जमीन घेणाऱ्या काळया पैशाची पोती भरणाऱ्या,टुमदार बंगल्यात महागड्या गाड्यांमधून फिरणाऱ्या,अनेकांनी बाजारात माणूसपणाचा धंदा मांडलेला आहे.
आमच्या सुख दुख वर्ती झालंर घालण्याचा प्रयत्न करताना देखील ते दिसून येत नाहीत. रस्त्यावरच्या गर्दीत माणूस हरवल्यासारखं बाजारात हरवलेला “माणूसपण” शोधा तुम्ही साहेब!
हव तर तुमच्या फौजदार साहेबांना सांगा,
एक वेडा माणूस आला होता.
“माणूसपण” हरवल्याची तक्रार द्यायला.
आणि खुर्चीतून उठताच तडक तो माणूस आल्या माघारी निघून गेला.त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ठाणे अंमलदार सावंत साहेब एकटक पहात होते.त्याची ती तक्रार खरी होती.
मात्र ‘डायरी’ वरती त्याची नोंद करून घेता येत नव्हती.
“माणूसपण” हरवल्याची तक्रार म्हणून !
———————————————
अतिशय सुंदर 💯😍
खूपच छान लेख,,शिंगे सर
सर उत्कृष्ट लेखन सलाम…
धन्यवाद
Sir very well written by you 👏👍👌 no1