Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२ : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर ३० जून २०२२ पर्यंत साठा निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सह सचिव चारुशीला तांबेकर यांनी दिली आहे.
खाद्यतेल व खाद्य तेलबियांच्या साठवणुकीवर साठा निर्बंधाची मर्यादा खालीलप्रमाणे-
खाद्यतेल साठा-किरकोळ ३० क्विंटल, घाऊक- ५०० क्विंटल, मोठे ग्राहक ३० क्विंटल पासून १ हजार क्विंटल -९० दिवसांची साठा क्षमता.
खाद्य तेलबिया- किरकोळ १०० क्विंटल, घाऊक- २ हजार क्विंटल, ९० दिवसांचे खाद्यतेलाचे उत्पादन.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार उपरोक्त साठा निर्बंधांच्या मर्यादेमधून वगळण्यात आलेल्या बाबी खालीलप्रमाणे आहेत.
निर्यातक, जो की रिफायनर, मिलर, एक्स्ट्रॅक्टर, घाऊक व्यापारी किंवा किरकोळ व्यापारी किंवा डिलर आहे, ज्याच्याकडे विदेश व्यापार महानिदेशालय यांच्याकडून देण्यात आलेला आयातक निर्यातक कोड नंबर आहे, जर असा निर्यातक दर्शवू शकला की त्याच्याकडे उपलब्ध असणारा खाद्यतेल व तेलबियांचा संपूर्ण साठा किंवा त्या साठ्याचा काही भाग निर्यातीसाठी असून सदर साठा निर्यातीसंबंधीच्या साठा निर्बंधाच्या मर्यादेत आहे.
आयातक, जो की रिफायनर, मिलर, एक्स्ट्रॅक्टर, घाऊक व्यापारी किंवा किरकोळ व्यापारी किंवा डिलर आहे. जर असा आयातक दर्शवू शकला की त्याच्याकडे उपलब्ध असणा-या खाद्यतेल व तेलबियांच्या साठ्याचा काही भाग आयातीतून प्राप्त झाला आहे.
जर संबंधित कायदेशीर घटकांकडे असणारा सर्व खाद्यतेल व तेलबियांचा साठा निर्बंधांच्या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास संबंधितांनी त्याबाबतचा तपशिल https://evegoils.nic.in या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करावयाचा आहे. संबंधितांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारा साठा या साठा निर्बंधाच्या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत कमी करणे आवश्यक असेल.