Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि. २८: सिध्दनेर्ली पूरग्रस्तांना स्वतंत्र मालकीपत्र द्या, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. शासकीय विश्रामगृह येथे आज सिध्दनेर्ली येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जागे संदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव, कागल तहसिलदार शिल्पा ठोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तसेच सिद्धीनेर्ली चे पूरग्रस्त उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, पूरगस्तांना देण्यात आलेल्या या ३८ आर जागेचे रेखांकन करुन घ्या. या जागेच्या स्वतंत्र मालकीपत्राचे दस्त करुन घ्यावेत, अशा सूचनाही श्री. रेखावार यांनी दिल्या.
सन १९८९ च्या महापूरात कागल तालुक्यातील मौजे सिध्दनेर्ली गावातील २२ कुटूंबांच्या घरात पाणी आल्यामुळे या कुटूंबांना गायरान जमिनीवर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले होते. या २२ कुटूंबांना शासनाच्यावतीने मौजे सिध्दनेर्ली येथील गट क्रमांक ७७ मधील ३८ आर (गुंठे) जागा सप्टेंबर १९८९ ला वाटप करण्यात आली व त्यांच्या नावे एकत्रित सातबारा पत्रकावर नोंद करण्यात आली. या जागेची सिटी सर्व्हेमध्ये नोंद होऊन प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता पत्रक) मिळावे, अशी मागणी या २२ कुटूंबांनी केली आहे.
पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत सरपंच दत्ता पाटील, कृष्णात मेटील, शाहीर सदाशिव निकम यांनी माहिती दिली.