Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १९ : सकाळच्या सत्रातील सामना पद्मा पथक विरुद्ध टीपीसी आरजीएफ यांच्यात अटीतटीचा झाला. दोन्ही संघासाठी आपले पुढील फेरी मधील अस्तित्व टिकवण्यासाठी निर्णायक सामना असल्याने दोन्ही संघांनी पहिल्यापासूनच आक्रमक खेळ केला. टी पी सी आर जी एफ संघाला ११ व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नर पंचांनी बहाल केला या संधीचा अचूक फायदा उठवत संघाच्या कर्णधार मोहन गवळी यांनी गोल करून संघास १-० आघाडी मिळवून दिली. पद्मा पथक संघाच्या खेळाडूंनी गोल करण्याची शर्तीचे प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही आणि अंतिम गोल फलक १-० राहिल्यामुळे हा सामना टीपीसी आरजीएफ संघाने जिंकला.
दुपारच्या सत्रातील सामना साई मराठा विरुद्ध तडाका तालीम या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यातील साई मराठा या संघास हा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे असलेने पहिल्यापासूनच त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन सुरुवात केली. सामन्याच्या दहाव्या मिनिटात माज सय्यद याने अप्रतिम असा मैदानी गोल करून संघाचे खाते उघडले. लगेच सामन्याच्या १२ व्या मिनिटास साई मराठा संघाच्या पारस पाटील यांनी बिनचूक आसा वेध घेत संघाचा दुसरा गोल नोंदविला. सामन्याच्या २१ व्या मिनिटास आशिष पाटील यांनी गोल करून संघाची आघाडी ३-० अशी केली. सामन्याच्या २५ व्या नंतर साई मराठा संघास सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्यांना त्याचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. २८ व्या मिनिटास अभिषेक कावरे यांनी उत्कृष्ट असा मैदानी गोल करून संघाचे आघाडी ४-० वर पोचवली. २९ व्या मिनिटास माज सय्यद यांनी आपला वैयक्तिक दुसरा व संघाचा पाचवा गोल करून संघास ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास पाच मिनिटांचा अवधी असताना अचानक पाऊस आल्याने सामना पुढे घेण्याबाबत स्पर्धा समितीचा निर्णय झाला.