Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी:
प्राथमिक शाळा दिल्लीच्या धर्तीवर बांधणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. करंबळी ता. गडहिंग्लज येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. येथील श्री. बाळनाथ दूध संस्थेचा सुवर्णमहोत्सव, श्री. महालक्ष्मी दूध संस्थेचे उद्घाटन, बांधकाम कामगारांना ओळखपत्रासह सुरक्षा साहित्य संच व त्यांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप तसेच तब्बल १३ कोटीच्या विकासकामांचे लोकार्पण असा संयुक्त कार्यक्रम झाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ॲड. विकासअण्णा पाटील होते.
भाषणात मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, समाजकारणात आणि राजकारणात गोरगरीब माणूस कधीही नजरेआड होऊ दिला नाही. जनतेने संधी दिल्याने मतदारसंघाचा कायापालट केला. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. सत्ता कधी डोक्यात जाऊ दिली नाही. सत्तेच्या संधीतून गोरगरिबांचे कल्याण साधले. माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि मी स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या नेतृत्वाखाली एकाच गटात काम करत होतो. हसन मुश्रीफ आमच्यातून निघून गेले आणि त्यापासून आमच्या गटाला अवकळा आली. मुश्रीफ मात्र एकही दिवस सत्तेविना राहिले नाहीत. आमदारकी मंत्रिपदासह, जिल्हा बँक, गोकुळ, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद अशा सगळ्याच सत्ता त्यांच्या हातात आहेत.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या भागाला विकासकामाच्या मुख्य प्रवाहात आणलेच आहे. मंत्री मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे या भागाचा अजूनही मोठ्या प्रमाणात कायापालट होईल.
जिल्हा परिषद सदस्य अमरीषसिंह घाटगे म्हणाले, या आधीचा हा भाग आणि आत्ताचा हा भाग यामध्ये जमीन-अस्मानचा फरक पडलेला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विकास कामांमुळे हा विधायक बदल झालेला दिसतो. ॲड. विकासअण्णा पाटील, राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुरेश कुराडे, माजी उपसरपंच सौ. कोमल सुतार यांचीही यावेळी भाषणे झाली.
“मुश्रीफच लोकनेता……
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हाच खरा लोकनेता आहे. कारण, पहाटे पाच वाजल्यापासून रात्री अकरा – बारापर्यंत जनतेचे प्रश्न सोडवत असतात. जनतेत मिसळून रहात असतात. सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते, ती विलास खोरीसाठी नसते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. जनतेच्या सुख-दुःखात समरस होऊन ते जगत आहेत.
व्यासपीठावर गोकुळ दूध संघाच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, उदयराव जोशी, विद्याधर गुरबे, आप्पासाहेब पाटील, शिवाजीराव पन्हाळकर, संभाजी पाटील, बाळकृष्ण कांबळे, सौ. श्रीदेवी पाटील, मलगोंडा पाटील, बाळासाहेब शेरेकर, गोपाळ शेरेकर, तानाजी कणसे, के. डी.पवार, संभाजीराव पाटील, एकनाथ गवस एन. डी. पाटील, प्रवीण महाडिक आदी प्रमुख उपस्थित होते.