मुंबई/प्रतिनिधी :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करुनही बंडखोर नेते एकनाथ शिंदे माघारी फिरायला तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकिय निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं दाखवून दिलं. यावेळी सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचं प्रेम पाहून गलबलून गेले, त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं.शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है… कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला….. अशा घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला. शिवसैनिकांचं प्रेम पाहून उद्धव ठाकरेंना देखील गलबलून आलं.त्यांनी शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढली अन् गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. यावेळी त्यांच्याबरोबर पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील होत्या.