Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी दि. ३० : जिल्हाधिकारी कार्यालय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं कसब निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यामध्ये होते, असे गौरवोद्गार काढून महसूल विभागात उत्कृष्ट काम करुन प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यात शंकरराव जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. पुढील काळात त्यांची निश्चितच उणीव भासत राहील, असे भावनिक उद्गार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले.
निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्या सेवा निवृत्ती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. यावेळी शंकरराव जाधव यांचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा भेट देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी, शंकरराव जाधव यांच्या पत्नी अनिता जाधव यांच्यासह कुटुंबिय व महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, प्रशासनात अभ्यासू व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची सोबत असेल तर निश्चितच नागरिकांना गतीने सेवा उपलब्ध करुन देता येतात, याची प्रचिती शंकरराव जाधव यांच्या कामातून दिसून आली. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध उपक्रम राबवून महसूल विभागातील विविध प्रलंबित विषय मार्गी लावण्यामध्ये शंकरराव जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, शंकरराव जाधव यांनी आजवर निस्वार्थी भावनेने शासनाची सेवा करुन माणसांप्रति भावनिक नाते जपले. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून कर्मचारी व जिल्हाधिकारी यांच्यातील दुवा म्हणून केलेलं काम वाखाणण्याजोगे आहे. “मनाने दिलदार.. बोलणं दमदार, वागणं जबाबदार.. दिसणं रुबाबदार.. व्यक्तिमत्त्व तजेलदार.. असं व्यक्तिमत्त्व प्रशासनात होणे नाही” अशा शब्दांत संजयसिंह चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले.
आजवरच्या सेवा काळात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून लोकांच्या अडचणी जाणून घेवून त्या सोडवण्यासाठी मनापासून काम केलं. पारदर्शी पद्धतीनं काम करा. लोकांच्या समस्या आपल्या समजून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या कामातून माणसं जोडा. कुटुंबाकडे लक्ष द्या. सकारात्मक रहा. कामाचा ताण घेऊ नका. प्रकरणांचा अभ्यास करुन कामे गतीने मार्गी लावा, असा संदेश शंकरराव जाधव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनोगतातून दिला.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची झोकून देऊन काम करण्याची पद्धत, पारदर्शीपणा, त्यांनी माझ्या कामावर दाखविलेला विश्वास, काम करताना दिलेली मोकळीक यामुळेच मला चांगले काम करता आले. जिल्हाधिकारी यांनी नागरिकांसाठी केवळ आपल्या कार्यालयाचे दरवाजे उघडे केले नाहीत, तर त्यांच्या मनाची दारेही नागरिकांसाठी खुली आहेत. अशा कर्तव्यदक्ष लोकप्रशासकासोबत काम करता आलं, हे माझं सौभाग्य आहे, आपण सर्वजण सदैव माझ्या स्मरणात रहाल, अशी भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.