Getting your Trinity Audio player ready...
|
मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – ब्रम्हनाळ (ता.पलूस) येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत असताना बोट पलटी झाल्याची घटना घडली आहे. यात 14 जणांना जलसमाधी मिळाली आहे.तर, 9 जणांचे मृतदेह आढळले असून अद्याप 7 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
कृष्णा, वारणा नद्यांच्या महापुराचा विळखा कायम आहे. सांगलीत दूध, पाणी, भाजी यासाठी लोकांना फारच कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी गर्दी झाली होती. पूरग्रस्त भागात वीज सेवा पूर्णपणे बंद आहे.
ब्रम्हनाळ (ता.पलूस) येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत होते. खासगी बोटीतून पूरग्रस्तांना घेऊन जात असताना बोट उलटली. बोटीमध्ये 30 ते 32 जण असल्याची माहिती मिळाली आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बोट उलटली आहे. बोटीतील बेपत्ता 16 जणांचा शोध सुरु आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे मदतकार्य सुरु झाले आहे.
ब्रम्हनाळमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एका बोटीचा वापर करण्यात येत होता. ब्रम्हनाळपासून खटावकडे या पूरग्रस्तांना नेण्यात येत होते. बोटीची क्षमता 17 जणांची असताना या बोटीत 30 जण बसले होते. त्यामुळेच सर्व पूरग्रस्तांकडे पुरेसे लाईफ जॅकेट्स नसल्याची माहिती समोर येत आहे.
बोट जात असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोटीला हादरा बसला. त्यातच बोटीचा पंखा झाडा झुडपात अडकल्याने बोट उलटली. त्यामुळे बोटीत बसलेले नागरिक पुराच्या पाण्यात पडले. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे त्यात 14 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला, तीन पुरुष, दोघा लहान मुलांचा समावेश आहे, तर इतरांविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. इतर बेपत्ता पूरग्रस्तांचा शोध सुरु आहे.
सांगलीचे पालकमंत्री जिल्हा सोडून पुण्यात!
सांगलीला जात असताना भाजपची पुण्यात बैठक सुरू असल्याचे मला कळले. या बैठकीला जाण्याचा मोह मला आवरला नाही. या बैठकीत सांगली, कोल्हापूरातील पूरबाधितांसाठी मदत उपलब्ध होऊ शकते, या विचाराने मी या बैठकीला गेलो. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या बैठकीला उपस्थित राहिलो, असे मदत व पुनर्वसन मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यामध्ये पुराणे थैमान घातले असून, आजही 30 ते 35 हजार नागरिक पुरात अडकले आहेत, असे असताना सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हे गुरुवारी पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.