कोल्हापूर/प्रतिनिधी : जुलै महिना सुरु झाल्यापासून राज्यात पावसाने चांगला जोर धरल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गेल्या सात तासांमध्ये पंचगंगा नदीची पातळी ७ फुटांनी वाढली आहे. तर राजाराम बंधारा येथील पाण्याची पातळी २४ फुटांवर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत सहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट इतकी आहे, तर धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.