Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली, या संविधनामध्ये काय झाल्यास काय करायचे याबाबतची उत्तरे उपलब्ध आहेत. ही राज्यघटना हजार वर्षे बदलावी लागणार नाही, असे सांगून शेतकरी, उद्योगपती व सर्वसामान्य नागरिकांनी मेहनत घेऊन देशाला समृद्धीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सन २०१४ नंतर देशाच्या विकासाला अधिक चालना मिळाली. प्रधानमंत्री यांनी सबका साथ सबका विकास हा नारा देऊन सर्वसामान्य नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे श्री. पाटील यांनी सांगून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत २५ कोटी तिरंगा ध्वज तर महाराष्ट्र राज्यात अडीच कोटी तिरंगा ध्वज फडकवण्यात आले. देशाच्या युवा पिढीमध्ये देशाभिमान जागृत करण्यात ही मोहीम अत्यंत मौलिक ठरली आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे उपस्थित असलेले स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार यांना चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी ठीक नऊ वाजून पाच मिनिटांनी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तीन रंगांचे फुगे हवेत सोडून स्वातंत्र्यदिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच येथे उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना चंद्रकांत पाटील यांनी भेटी घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संविधान स्तंभाचे अनावरण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या संविधान स्तंभाची उंची १५ फूट आहे. हा आकर्षक संविधान स्तंभ रात्रंदिवस काम करून अवघ्या आठ दिवसात तयार करून घेतल्याबद्दल श्री. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
या संविधान स्तंभाच्या चबुतऱ्याचे दगडी बांधकाम दहा फूट उंचीचे असून त्यावर सोनेरी रंगाची पाच फूट उंचीची आकर्षक राजमुद्रा बसवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला उभारण्यात आलेला हा संविधान स्तंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचे आकर्षण ठरला आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता संजय कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उप अभियंता महेश कांजर, शाखा अभियंता वैभव जाधव यांनी परिश्रम घेतले.लामण दिवा व सेल्फी पॉईंट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेला लामण दिवा व सेल्फी पॉईंट अभ्यागतांचे आकर्षण ठरत असून याठिकाणी फोटो घेण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील दुर्गम भागात आरोग्य सेवा दिलेले कर्मचारी श्री प्रकाश रामचंद्र नाईक, श्रीमती दिपाली संतोष गोवीलकर, श्रीमती रेखा पांडुरंग दोरूगडे, श्रीमती शांता केरबा जाधव यांचा सत्कार करण्यात आला.पिंपळगाव खुर्द येथे लसीकरण कार्यक्रमात आपल्या सतर्कतेने तोतया डॉक्टर पकडून देण्याचे कार्य करणारे आरोग्य कर्मचारी अजित अशोक चौगुले, देवानंद मुंकुद कांबळे, श्रीमती अर्चना देवेंद्र सरनाईक, श्रीमती माधुरी राजेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शिक्षण विभागाचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा सन २०२१ मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी योगेश अशोक नेजे, इशान भुषण म्हेत्रे, रोहन शहाजी पाटील, विश्वजीत विनायक बांदल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.स्वच्छ विद्यालय राज्यस्तरीय पुरस्कार २०२०-२०२१ प्राप्त शाळांचा गौरव यावेळी करण्यात आला. यामध्ये प्राथमिक, शहरी भागातून, कोल्हापूर पब्लिक स्कूल (राज्यात प्रथम),माध्यमिक,ग्रामीण भागातून, आदर्श विद्यालय कोथळी, ता.शिरोळ(राज्यात प्रथम) याचा समावेश आहे.तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ॲपल हॉस्पिटल व सावित्रीबाई फुले या हॉस्पिटलचा सत्कार यावेळी श्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.