Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर, दि.१७ कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये गांधी मैदान, जयप्रभा स्टुडिओसह नगरोत्थानमधून घ्यावयाच्या विकास कामांच्या अनुषंगाने बैठक झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असणारे गांधी मैदान दरवर्षी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरास निरुपयोगी राहते. शिवाजी पेठ परिसरात राहणारे सुमारे ६० हजाराहून अधिक नागरिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या गांधी मैदानाचा लाभ घेतात शिवाय पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे गांधीमैदान परिसरातील काही घरामध्ये पाणी शिरून जनजीवन बाधीत होते. सदर प्रश्नावर निर्णायक तोडगा काढण्यासाठी दि. १३/०८/२०२२ रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीमध्ये शहर अभियंता यांनी गांधी मैदान प्रश्नाबाबत माहिती देताना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली ही बाब अत्यंत गंभीर असून शहरातील विकासकामासाठी प्रयत्नशील असणाऱ्या लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या प्रयत्नांना खीळ घालणारी आहे. सबब प्रचलित कायदे व नियमानुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांच्या जागी सक्षम अधिकारी नेमावा असे आदेश प्रशासक तथा आयुक्त महानगरपालिका यांना दिले.
गांधी मैदानाबाबतचा सर्वंकष आराखडा तयार त्वरीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मा. कार्यकारी अध्यक्ष यांनी दिले. नगरोत्थान मधील कामांना तत्वतः मान्यता मिळूनही सुधारित प्रस्ताव महानगरपालिकेकडून शासनास सादर झालेला नाही याबाद्दल मा. कार्यकारी अध्यक्ष यांनी नाराजी व्यक्त केली. जयप्रभा स्टुडिओच्या प्रश्नाबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसर तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. नगररचना विभागाच्या कामकाजाबाबत मा.कार्यकारी अध्यक्ष यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करुन प्रशासकांनी आठवड्यातून एक दिवस त्यांचा आढावा व कार्यालयास भेट देण्याच्या सूचना केल्या.
सदर बैठकीस मा.राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ, महाराष्ट्र राज्य, प्रशासक तथा आयुक्त कादंबरी बलकवडे मनपा, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, राहूल चव्हाण, नंदकुमार मोरे, किशोर घाडगे व महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी हजर होते.