Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : शहरातील पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी, प्रदूषित पाणी प्रश्नी बुधवारी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या शिष्टमंडळाने शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन त्याठिकाणी पाहणी केली. जलअभियंता यांना धारेवर धरुन २६ जानेवारी पूर्वी पाणी परिषद भरवून शहरातील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली.
मुबलक पाणी असताना ही केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कोल्हापूर शहरात पाण्याची समस्या तीव्र होत आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या जिव्हाळ्याच्या पाणी विषयाबाबत आज भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या शिष्टमंडळाने शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्रावर प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी पंपीग स्टेशनमधील गळती, अस्वच्छता निदर्शनास दिसली. कोल्हापूर महानगरपालिका आपल्या जनतेला मुलभूत गरज असणारे स्वच्छ पाणी देण्यात निष्क्रिय ठरली आहे असे सांगून जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी जलअभियंता हर्षद घाडगे यांना धारेवर धरले.
शिंगणापूर पंपिंग स्टेशन येथे एक पंप गेली वर्षभर बंद असून याबाबतची वर्क ऑर्डर अद्यापही झालेली नाही. पंपिंग स्टेशनच्या पंपांचे आयुर्मान संपलेला आहे किंवा वर्क ऑर्डर कितीला मागितली पण अजून मिळालेली नाही अशा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला. जल अभियंता हर्षित घाडगे यांनी असमाधानकारक उत्तरे दिली. तिथे अभियंता जाधव व जलअभियंता यांच्यामध्येच आपल्या कामामध्ये एकवाक्यता नसल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले. या विषयात इतके दुर्लक्ष का ? थेट पाईपलाईन होणार म्हणून इकडे खर्च करायचा नाही अशा विशेष सूचना आहेत काय ? असा सवाल उपस्थित केला. शिष्टमंडळाच्या अनेक प्रश्नांवर अधिकारी निरुत्तर झाले.
यासाठी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने उद्या गुरुवार दि.१९/१२/२०२३ रोजी दुपारी १२ वाजता आयुक्त तथा प्रशासक, जलअभियंता, उप जलअभियंता, अतिरिक्त आयुक्त यांची बैठक घेऊन शहरातील पाणी प्रश्नाचा उडालेला बोजवारा, अपुरी पाणी व्यवस्था, दुषित पाणी, थेट पाईपलाईनला विलंब, पाणी गळती या विषयाबाबत उद्या जनतेला उत्तरे द्यावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केली आहे.
यावेळी सरचिटनीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, राजू मोरे, प्रदीप उलपे, अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, नाना कदम, वैभव माने, विजय सूर्यवंशी ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.