कागल मध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्यासाठी संबंधित विभागांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : येत्या १९ फेब्रुवारी रोजी कागल येथील देवचंद कॉलेज (अर्जुन नगर) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता ज्या-ज्या विभागांवर सोपवण्यात आलेली जबाबदारी संबंधित विभागांनी काळजीपूर्वक व चोखरित्या पार पाडावी. यात कोणतीही हयगय होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील बेरोजगार मराठी युवक-युवतींसाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

Advertisements

या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील किमान आठ ते दहा हजार युवक-युवती उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करुन जिल्हाधिकारी राहूल रेखावार म्हणाले, देवचंद कॉलेज ते निपाणी, अर्जुननगर ते निपाणी, गडहिंग्लज ते देवचंद कॉलेज या मार्गावर परिवहन विभागाने शटल रुपाने बस सेवा सुरु ठेवावी. त्याचबरोबर या रोजगार मेळाव्यासाठी कर्नाटक सीमा भागातील युवक-युवतींनी निपाणी येथे यावे. तेथून त्यांना एस.टी. बसेसव्दारे मेळाव्यास्थळी आणण्यात येईल. कागल-०५, गडहिंग्लज-०६, निपाणी -१० आणि मुरगूड येथून ०३ अशा एकूण २४ बसेसव्दारे उमेदवारांची मेळाव्यास्थळी ने-आण करण्यात येईल. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी आपापसात योग्य तो समन्वय ठेवून हा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. 

या आढावा बैठकासाठी जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, राधानगरी उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, सहायक आयुक्त कौशल्यक विकास संजय माळी, कागल तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शेळके, सर्वश्री एकनाथ आंबोकर, सचिन सांगावकर, डॉ. योगेश साळे, तैमुर मुल्लाणी, अन्न व औषध आयुक्त मो.श. केंबळकर, प्रताप पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *