कोल्हापूर: भारतीय अणुसंशोधन केंद्र, मुंबई ही देशातील अग्रगण्य न्युक्लिअर अथवा अणु तंत्रज्ञानाच्या बाबतीत संशोधन करणारी अग्रेसर व जगमान्य प्रतिष्ठित संस्था आहे. यांच्याद्वारे ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञान पुरवण्यासाठी देशातील ३ महाविद्यालयांची निवड केली असून त्यामध्ये कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड झाल्याची माहिती संचालक डॉ. मोहन वणरोट्टी यांनी दिली. त्याबाबतचा सामंजस्य करार नुकताच संपन्न झाला.
अणुसंशोधन केंद्र ग्रामीण भारताच्या विकासासाठी सुद्धा विविध प्रकारचे प्रयत्न संशोधन करीत असते.आकृती’ या त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात त्यांनी देशभरातील तीन अभियांत्रिकी महाविद्यालयांची निवड तंत्रज्ञान हस्तांतरण (टेक्नॉलॉजी ट्रान्सफर)यासाठी केलेली आहे. ज्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्षात आणलेले तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तीन महाविद्यालयांची निवड केलेली आहे. त्यातील एक महाविद्यालय कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केलेल्या अनेक विकसित तंत्रज्ञानाच्या पैकी एकूण आठ प्रॉडक्ट अथवा तंत्रज्ञान केआयटी ला दिले जाणार आहे. केआयटी मधील निवडक प्राध्यापकांना बी.ए.आर.सी. च्या वतीने प्रशिक्षित केले जाणार असून त्यांच्या सहयोगाने हे विकसित झालेले तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत जाणार आहे.
*भाभा अणूशक्ती केंद्राबरोबर काम करण्याची संधी मिळणे केआयटी साठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे . भाभा अणुशक्ती केंद्राने केआयटी ची निवड करणे हे आजवरच्या केआयटी च्या शैक्षणिक गुणवत्तेचा मान असून या तंत्रज्ञान हस्तांतरणांमुळे केआयटीतील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा याचा मोठा लाभ होणार असून स्थानिक उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने अधिकाधिक ग्रामीण भागापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवण्यात केआयटी नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केला.
हि संधी मिळण्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ व्ही.व्ही.कर्जिन्नी, संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली व सचिव दिपक चौगुले यांनी मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. केआयटीच्या आयडिया लॅब चे प्रमुख डॉ.एस. एम.पिसे, डॉ. सुनील कारीदकर या प्राध्यापकांनी ही संधी मिळण्यासाठी अपार परिश्रम घेतले. कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राकडून केआयटी चे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले जात आहे. कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी हा मानाचा तुरा असल्याचे मत अनेक उद्योजकांनी व्यक्त केले.