
सांगली दि. १९, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी बौद्ध म्हणजेच महार आणि मातंग समाजाच्या उमेदवारांना आरक्षित मतदारसंघातून जाणीवपूर्वक डावलल्याचा गंभीर आरोप आंबेडकरी चळवळीचे नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. जर या समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले नाही , तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलने प्रबोधनाचा मार्ग छेडून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आरक्षणातून दिल्या जाणाऱ्या उमेदवारींच्यामध्ये विशिष्ट जातीला झुकते माप : डॉ. कांबळे यांनी आपल्या पत्रकात असे म्हटले आहे की , सांगली जिल्ह्यातील प्रस्थापित पक्ष केवळ एका विशिष्ट मागासवर्गीय जातीलाच उमेदवारी देऊन इतर समाजावर अन्याय करत आहेत : मागासवर्गीय प्रवर्गातील सर्व जातींना ( विशेषतः बौद्ध, मातंग आणि महार समाजाला ) राजकीय प्रक्रियेत समसमान वाटा आणि न्याय मिळायला हवा , अशी आग्रही मागणी त्यांनी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडे केली आहे. ज्या पक्षांनी या समाजाला उमेदवारी नाकारली आहे, त्यांच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्यात रान उठवले जाईल. ठिकठिकाणी सभा आणि आंदोलने करून समाजातील रोष व्यक्त केला जाईल. प्रस्थापित पक्षांनी आपली भूमिका न बदलल्यास, बौद्ध, महार आणि मातंग समाज एकत्र येऊन आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

“सांगलीच्या राजकीय पटलावर बौद्ध, मातंग आणि महार समाजाची मोठी ताकद आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील प्रस्थापित नेते या समाजाचा वापर फक्त मतपेढी म्हणून करत आहेत. उमेदवारी देताना मात्र या समाजाला डावलले जात आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही.”
डॉ.महेश कुमार कांबळे(आंबेडकरी समाजाचे नेते)
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर असताना डॉ. महेशकुमार कांबळे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या गोटात खळबळ माजली आहे. आता हे पक्ष या समाजाला उमेदवारी देऊन शांत करणार की डॉ. कांबळे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा सामना करणार , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात 
