Getting your Trinity Audio player ready...
|
उपसंपादक दिनेश चोरगे : माजी महसूलमंत्री मा.नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत यश मिळवावे, यासाठी ‘विद्या प्रबोधिनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधांनी युक्त व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे.
विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेली कोल्हापूरातील अग्रण्य संस्था होय. विद्या प्रबोधिनी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शौक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने अनेक उपक्रम राबवले जात असतात. माफक फी, तज्ञ शिक्षक, प्रशस्त इमारत, सुसज्ज ग्रंथालय, विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीसाठी सतत विविध उपक्रम यामुळे विद्या प्रबोधिनीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
सध्या कोव्हीड-१९ आणि लॉकडाऊन यामुळे एक मोठं जागतिक संकट सर्वांसमोर निर्माण झाले आहे. अनेकांचा रोजगार बंद झाला, व्यवसाय सुरु नसल्याने याचा सर्व परिणाम किमान एक वर्ष संपूर्ण समाज व्यवस्थेवर आर्थिकदृष्ट्या दिसून येणार आहे.
सध्या माणूस फक्त जगण्यासाठी धडपडत आहे. गोरगरीब व मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. आर्थिक संकटांची कुऱ्हाड सर्वसामान्य कुटुंबांवर कोसळली आहे. अशा गरजू कुटुंबांना मदतीचा एक हात देण्यासाठी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वीत असलेल्या विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने “एक महिन्याचा रोजगार आमच्याकडून” असा सामाजिक उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
ज्या कुटुंबामध्ये सध्या कोणीही नोकरीवर नाही, अशा कुटुंबातील एका सदस्याला विद्या प्रबोधिनी संस्थेमार्फत एक महिन्याचा रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा रोजगार देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची अट नसून वय वर्ष १८ ते ५५ मधील सर्व स्त्री-पुरूषांना यामध्ये सामील होता येणार आहे.
सध्या अनेक व्यवसाय, उद्योगधंदे यांना मनुष्यबळाची गरज आहे, परंतु पुरेसे मनुष्यबळ उपलब्धता होऊ शकत नाही किंवा त्या मनुष्यबळाचा खर्च परवडत नाही. विद्या प्रबोधिनी अशा व्यवसाय आणि उद्योगांना मनुष्यबळ पुरवेल आणि एक महिन्याचा पगार सुद्धा विद्या प्रबोधिनी मार्फत दिला जाईल.
यामुळे सध्याच्या मंदीच्या काळात उत्पादन आणि व्यवसाय स्थावर होण्याच्या दृष्टीने व्यवसायांना, उद्योगांना मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्याचबरोबर ज्या व्यवसायिकांना आणि उद्योजकांना मनुष्यबळाची गरज आहे, अशांनी देखील विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या व्यवसाय आणि रोजगार मार्गदर्शन विभाग प्रमुख नितीन कामत यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.