Getting your Trinity Audio player ready...
|
पालघर/मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – पालघर नगर परिषदेसाठी रविवार दि. २४ मार्च रोजी मतदान होत असून निर्भय आणि मुक्त वातावरणात पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याचे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी केले.
निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीबाबत श्री.सहारिया यांनी शनिवारी पालघर येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक श्रीधर डुबे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.सहारिया यांनी निवडणूक कार्यक्रम तसेच प्रशासनाच्या तयारीबाबतची माहिती दिली. पालघर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह १४ प्रभागांतील २८ जागांसाठी एकूण ९० उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. यासाठी ६२ मतदान केंद्र तयार करण्यात आले असून मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षण सत्र १० मार्च रोजी घेण्यात आले तर दुसरे प्रशिक्षण उद्या दि. १७ मार्च रोजी होणार आहे. निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणे, अवैध मद्य विक्री, बँकांचे व्यवहार यावर यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. भरारी पथकांसह इतर सर्व पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पोलीस यंत्रणाही दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी यासाठी माध्यमांचा सहभाग देखील मोलाचा असून मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी माध्यमांनी देखील प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री.सहारिया यांनी केले. राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्या जबाबदाऱ्याही महत्त्वाच्या असून प्रत्येक जण आपली जबाबदारी चोख पार पाडून प्रशासनाला निवडणूक सुरळीत पार पाडण्यास सहकार्य करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतल्यामुळे निर्भय आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी निवडणूक आयुक्तांना दिला. प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी सादरीकरणाद्वारे सुरू असलेल्या कामांबाबतची माहिती दिली. मतदारांसाठी तसेच उमेदवारांसाठी सुरू करण्यात आलेले ॲप, फिरत्या वाहनांसह विविध माध्यमांद्वारे मतदारांमध्ये जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.