Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : राज्यात खरीप पीक कर्जवाटपाची परिस्थिती समाधानकारक नसून जि. म. स. बँका व राष्ट्रीयकृत बँका यांना ४५,७८५ कोटी उद्दिष्ट असताना आजपर्यंत केवळ १२,३१५ कोटींचे कर्जवाटप पाहता ३०% उद्दिष्ट पुर्तता झाली आहे. यामध्ये राज्यातील बऱ्याच जि. म. स. बँकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने राष्ट्रीयकृत बँकांना ३२,२६१ कोटींचे उद्दिष्ट असताना त्यांनी केवळ ४९०० कोटींचे केलेले कर्जवाटप पाहता १५% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. राज्यात बहुतांश भागात वेळेवर पाऊस सुरु झाल्याने खरीपाची कामेही वेळेत व वेगात सुरु आहेत, मात्र शेतकऱ्याची पीककर्ज अभावी कोंडी झाली आहे. यावर सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे मांडले.
राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांनी पीक कर्ज उपलब्ध करुन न देण्यामागे सरकारने जाहीर केलेल्या रुपये २ लाखाच्या आतील थकीत कर्जदारांची रक्कम त्या बँकांना मिळाली नसल्याने अशा व रुपये २ लाखावरील थकीत शेतकऱ्यांना या बँकांनी कर्जवाटप केलेले नाही. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काल दि. २२ जून २०२० रोजी राज्यभर बँकांसमोर आंदोलन भाजपातर्फे केले असून, त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची अग्रणी बँक (बँक ऑफ इंडिया) येथे आंदोलन करतानाच एकूणच कर्जमाफीच्या घोषणा व प्रत्यक्ष अंमलबजावणी तसेच पीककर्ज वाटपातील बँकांची अनास्था याबाबत जिल्हाधिकारी यांनी निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधले आहे. या बाबीची सर्व वृत्तपत्रे व मिडीयाने दखल घेतली असून ना. मुश्रीफ यांना मात्र आमचे बँकेसमोरील आंदोलन दिसून आलेले नाही.
कोल्हापूर जि. म. स. बँकेने खरीप हंगामात १५८% पीक कर्जवाटप केले आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. तथापि जिल्ह्यातील बरेच शेतकरी राष्ट्रीयकृत बँकांकडे पीक कर्ज उचल करीत असून त्या बँकांकडे विनाकपात मिळणारी जास्तीची उचल मर्यादा पाहून त्यांचा कल तेथून कर्ज घेण्याचा आहे. अशा शेतकऱ्यांपैकी कर्जमाफीची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना या बँका खरीप कर्ज देत नसून, त्यांच्या थकबाकीचे काय ? हा प्रश्न ना. मुश्रीफ दुर्लक्षीत करीत आहेत.
आपण राज्याचे मंत्री आहोत, हे ध्यानात घेऊन त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दयावे. त्याचवेळी राज्यातील १४ जि. म. स. बँकांनी राज्य सरकारच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करुन थकित व कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप केलेले नाही याकडेही ना. मुश्रीफ यांनी राज्याचे अनुभवी मंत्री म्हणून लक्ष दयावे.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील थकित राष्ट्रीयकृत बँकांकडील कर्जदाराची कर्जमाफी प्राप्त न झाल्याने या शेतकऱ्यांच्या खरीप कर्जाचे काय करणार याचेही त्यांनी उत्तर दयावे, असेही भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.