Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : कोरोना रोगावर आजपर्यंत औषध किंवा लस निर्माण झाली नसल्याने, कोरोनावर मात करण्यावर प्रशासनास मर्यादा येत आहेत.
गेल्या चार महिन्यांतील परिस्थिती आणि गेल्या दहा दिवसातील परीस्थिती याचा गांभीर्याने विचार करता कोरोना रुग्णांची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र राज्य शासन, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी सह सर्वच शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करीत आहेत. परंतु, कोल्हापूर शहरात वाढती संख्या हा अत्यंत गंभीर विषय आहे.
कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराजांचे शहर असून, कोल्हापूरवासीयांचे दातृत्व जगजाहीर आहे. शहरातील अनेक तालीम संस्था, मंडळे, शैक्षणिक संस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यामुळे अपुरी आरोग्य यंत्रणा, जागेचा अभाव यावर उपाययोजना म्हणून शहरातील तालीम संस्था, मंडळे, शिक्षणसंस्था, दवाखाने, सांस्कृतिक कार्यालये यांनी स्वयंस्फूर्तीने मदतीस पुढे यावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, दातृत्व काय असते हे गेल्या महापुराच्या संकटकाळात कोल्हापूरवासियांनी दाखवून दिले आहे. “कमी तिथं आम्ही” ही कोल्हापूरकरांची खासियत आहे. तिची प्रचीतीही अनेक संकटकाळात आली आहे.
गेल्याच वर्षी झालेल्या महापुरातून कोल्हापूर सावरतेय न सावरतेय तोच कोरोनाच्या संकटकाळाने ग्रासले. कोरोनाच्या संकटकाळातही कोल्हापूरकरांनी आपल्या दातृत्वाचा झरा पुन्हा अधोरेखित केला आहे. लॉकडाउन काळात असणारे अन्नधान्य वाटप असेल अथवा आरोग्यविषयक वस्तू कोल्हापूरवासियांनी आपआपल्या परीने सर्वांना मदत केली.
त्याचमुळे एकमेकांच्या सहकार्याने कोल्हापुरातील स्थिती पुन्हा रुळावर येत असतानाच, गेल्या दहा दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. वाढती रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणेची मर्यादा यांमुळे कोल्हापुरातील स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. प्रशासन, डॉक्टर्स हे देवदूताप्रमाणे काम करीत आहेत. त्यांना कोल्हापुरवासीय नेहमीच सहकार्य करत आले असून, कोरोना रुग्णांवर उपचाराची गती वाढवून जास्तीत जास्त रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने क्वारंटाईन केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून उभारल्या गेलेल्या अनेक शाहूकालीन तालीम संस्थासह शहरात शेकडो मंडळे आहेत. त्यांच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. त्याचबरोबर सध्या शाळा, कॉलेज सुरु नसल्याने अनेक मोठ्या शिक्षण संस्थांची शाळा, कॉलेज बंद आहेत. यासह शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असणाऱ्या मंगल कार्यालयांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.
आपल्या सर्वांचीच ही सामुहिक जबाबदारी असून, कोरोना-विरुद्धच्या लढ्यात शहरातील तालीम संस्था, मंडळे, शिक्षण संस्था, मंगल कार्यालये यांनी स्वयंस्फूर्तीने मदतीस पुढे यावे. संस्थेच्या उपलब्ध इमारतीमध्ये स्वखर्चातून क्वारंटाईन केंद्रांची निर्मिती करावी.
यामध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड, मास्क, भोजन आदीसह मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करावा. यासह शहरातील डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी यांनीही माणुसकीच्या भावनेतून या क्वारंटाईन केंद्रांवर विनामोबदला सेवा बजावावी आणि सर्वांनी मिळून कोरोना विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत विजय मिळविण्यासाठी मोलाची भूमिका बजावावी, असे आवाहनही या पत्रकात श्री क्षीरसागर यांनी केले आहे.