कोल्हापूर/प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या नारी शक्ती पुरस्कारासाठी महिला कल्याणाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिला, महिला गट, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्जदाराने आपले अर्ज/ नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावयाचे आहे. प्रस्ताव दि. ३१ जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.
नामनिर्देशनासाठी पात्रता-
सर्व व्यक्ति आणि संस्थांसाठी पुरस्कार खुला आहे. वैयक्तिक श्रेणीच्या बाबतीत नामांकन मिळाल्याच्या तारखेच्या शेवटच्या तारखेस किमान वय २५ वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थेने संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षे काम केलेले असावे. यापूर्वी नारी शक्ती पुरस्कार व स्त्री शक्ती पुरस्कार प्राप्त व्यक्ति अथवा संस्था अर्ज करु शकणार नाहीत. व्यक्ति, संस्था, अशासकीय संस्था यांनी महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीकरिता तसेच महिलांसाठीच्या पारंपारिक व आधुनिक क्षेत्रामध्ये काम केलेले असावे. तसेच महिलांचे आरोग्य, शिक्षण, संरक्षण व काळजी व उन्नती, आदर व महिलांच्या सन्मानाकरिता काम केलेले असावे.
दोन लाख रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.