दहावी-बारावी परीक्षा ऑनलाइन घेण्यात यावी यासाठी राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन…!

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाइन  पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात सोमवारी अचानक, कोणतीही पूर्व सूचना न देता विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन परीक्षेच्या  मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. तर दुसरीकडे नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणी राज्य मंडळाच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी जमून निदर्शने केली आणि दहावी, बारावी परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी केली.

ऑफलाइन परिक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी सोमवारी धारावी येथे वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. दहावी बारावी परीक्षा ऑनलाइन घ्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या मार्च महिन्यात ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. मागील वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाली होती. यंदा ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्ध्या तासाचा अतिरिक्त वेळही देण्यात येणार आहे. मात्र ३१ जानेवारी रोजी राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी किंवा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी निदर्शने केली.

Advertisements

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निदर्शने केली. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहे, त्यामुळे अभ्यासाचा हवा तसा सराव झालेला नाहीये. ऑनलाइन क्लास करताना तांत्रिक अडचणींना सामना करावा लागल्याने त्याचा परिणाम अभ्यासावर झाला आहे. तसेच अभ्यासाचा लिखाणाचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे एक महिन्याच्या वेळ अभ्यासासाठी देत,मार्च एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षा एक महिन्यासाठी पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *