Getting your Trinity Audio player ready...
|
मुंबई/प्रतिनिधी :तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि माझ्या भेटीमुळे नव्या विचारांची सुरुवात झालेली आहे. आता देशाच्या मूलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा कारभार मोडून काढायला हवा. आता आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
तेलंगणचे मुख्यंमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशातील वातावरण दिवसागणिक गढूळ होत चालले असून सूडाचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे, असे सांगतानाच आमचे हिंदुत्व हे बदला घेणारे हिंदुत्व नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारला दिला.
यापुढे देशाचे काय होईल याबाबत विचार व्हायला हवा होता. आता त्याची सुरुवात आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र आणि तेलंगण राज्याची १००० किलोमीटरची सीमा आहे. या दोन राज्यांमधील संबंध चांगले राहायला पाहिजेत. आमच्या आजच्या भेटीमुळे नव्या विचारांची सुरुवात झालेली आहे. आता देशाच्या मूलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा कारभार मोडून काढायला हवा. आता आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.