Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी : धावपळीच्या युगात महिलांचं स्वतःच्या आरोग्याकडं दुर्लक्ष होत असल्यामुळं महिलांमध्ये शारीरिक तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्याकडं वेळीच लक्ष देऊन महिलांनी स्वतःचं आरोग्य जपावं, असा सल्ला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी महिलांना दिला. पाटगाव इथं भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी महिला बचत गटाचा मेळावा आणि आरोग्य शिबिर असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला.
भुदरगड तालुक्यातील पाटगाव इथं भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं महिलांसाठी आरोग्य शिबिर आणि बचत गटाचा मेळावा आयोजित केला होता. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली. यावेळी सौ. अरुंधती महाडिक यांचा सत्कार स्मिता सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना सौ. महाडिक यांनी महिलांशी संवाद साधत, त्यांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला. ग्रामीण भागातील महिलांचं आरोग्याकडं दुर्लक्ष होत असल्यामुळं अनेक महिला आणि तरूणींना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. सध्या दवाखान्यांचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळं वेळीच आजारांचं निदान झालं तर, उपचार करणं सोयीचं होतं. त्या दृष्टीनं भागीरथी महिला संस्था, तसंच सिद्धांत हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्यावतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय, याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असं आवाहन सौ. महाडिक यांनी केलं. यावेळी सिद्धांत हॉस्पिटलच्या डॉ. अनुष्का सरपंच विलासराव देसाई, रुपाली सावंत, शशिकांत पाटील, प्रतिभा सातपुते यांनी मनोगतं व्यक्त केली. वाईकर यांनी महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचं निरसन केलं. यावेळी सौ. महाडिक यांच्या हस्ते ग्रामसंघाचं उदघाटन करण्यात आलं. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या संजोत कांबळे, स्मिता सुतार, नूतन राऊळ, सरिता देसाई, सुवर्णा देवळी, धनंजय महाडिक युवशक्तीचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे, प्रवीण आरडे, तुकाराम देसाई यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या