Getting your Trinity Audio player ready...
|
कौतुक नागवेकर
सांगली/प्रतिनिधी :
२९ एप्रिल २०१८ रोजी आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली होती,विशेष म्हणजे तेव्हा पक्ष सत्तेत नव्हता आणि अनेक दिग्गज नेतेमंडळी विरोधी पक्षाच्या आमिषाला भुलून पक्ष आणि आदरणीय शरद पवार यांना सोडून जात होती.आदरणीय साहेबांचे जवळचे,स्नेही नातेवाईक च सोडून जात आहेत म्हटल्यावर कार्यकर्ता ही पक्षात राहील की नाही याची शाश्वती नव्हती.भाजपने सरकारी संस्था हाताशी धरून राष्ट्रवादी च्या बड्या नेत्यांना आपल्या “ट्रॅप”मध्ये अडकवायच ठरवलं होतं नव्हे तसेच घडून येत होते.अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला होता.कोण प्रदेशाध्यक्ष होणार याविषयी चर्चा रंगत होत्या,अनेक खलबते होत होती.सत्ता असल्यावर अनेक नावे पुढे येत असतात,परंतु सत्ता नाही म्हटल्यावर मोजकीच नावे पुढे येत होती आणि सत्तेत नसलेल्या पक्षाला सांभाळायचे म्हणजे मोठी कसरतच होती.अशातच आदरणीय पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची माळ जयंत पाटील यांना गळ्यात घातली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण या चर्चांना पूर्णविराम दिला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अनेक आव्हाने उभी होती.पक्ष सत्तेत नव्हता,अनेक नेतेमंडळी पक्ष सोडून जात होती,पक्ष सत्तेत नव्हता तरीही कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्याचे भलेमोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.त्यांना माहीत होते सत्ता नसली तरी आपल्याकडे “शरद पवार साहेब” आहेत.चालतेबोलते विद्यापीठ आपल्याकडे आहे.
जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “परिवर्तन यात्रा” या संकल्पनेचा कार्यक्रम आखला.महाराष्ट्रात परिवर्तन करायचे च याचा चंग बांधला,आपल्या पक्षाच्या प्रत्येक विंग च्या अध्यक्षांनी,पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याचे सांगितले.कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या,आदरणीय साहेबांच्या विचारांचा,राष्ट्रवादी विचारांचा कार्यकर्ता तुटू देऊ नका असे आवाहन सर्वांना केले.परिवर्तन यात्रेनंतर महाराष्ट्रात झालेले सत्ताबदल आपण पाहत आहातच.
परिवर्तन यात्रेनंतर देशात लोकसभा निवडणुका लागल्या,ज्यांना पवार यांनी खासदार केले होते,मंत्री केले होते असे अनेक जण शरद पवार यांना सोडून जात होते.देशात मोदीलाट होती,पक्षासमोर मोठे आव्हान होते.नुकतीच प्रदेशाध्यक्ष पदाचे सूत्रे घेतलेले जयंत पाटील यांनी अनेक ठिकाणी मुलाखती घेऊन चांगले स्ट्रॉंग उमेदवार देण्याचा प्रयत्न केला परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४ च खासदार या निवडणुकीत निवडून आले.लोकसभेनंतर विधानसभेचा बिगुल वाजणार होता.
लोकसभेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना सोबत घेऊन “शिवस्वराज्य यात्रा” काढण्याची अनोखी संकल्पना जयंत पाटील साहेबांनी आखली.प्रत्येक गावागावात, जिल्ह्याजिल्ह्यात जोरदारपणे शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत होऊ लागले,जनता तसेच कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शी जुळू लागले. आता मोठा टप्पा होता तो म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी अक्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांचे राम -लक्ष्मणाची जोडी म्हणजेच प्रतिकदादा आणि राजवर्धन दादा यांनी मेहनत घेतली.परिणामी सगळं विरोधात असताना ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५४ आमदार निवडून आले आणि जयंत पाटील यांना इस्लामपूर मधून सप्तपदी गाठली.मध्येच ४८ तासांचे सरकार स्थापन झाले,यावेळी आदरणीय पवार यांना जबाबदारी जयंत पाटील साहेबांच्या खांद्यावर दिली,त्यांना पक्षाचे गटनेते केले आणि ४८ तासांचा तिढा सुटून शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री विराजमान झाला.आदरणीय पवार साहेबांचा विश्वास सार्थ ठरवला म्हणून मुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादी च्या मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या २ मंत्र्यांमध्ये जयंत पाटील होते.जलसंपदा मंत्री म्हणून जयंत पाटील साहेबांनी शपथ घेतली.
सत्ता आली म्हणून हाताची घडी घालून चूप बसणारे जयंत पाटील नव्हते.आपल्या कार्यकर्त्यांची कामे व्हावीत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आपला परिवार आहे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये रुजावी म्हणून जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने “परिवार संवाद यात्रा” आखली.नुकतीच २३ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे परिवार संवाद यात्रेची समारोप सभा पार पडली.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १०० हुन अधिक आमदार निवडून आणण्याचा संकल्प यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत केला.