Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी: सामान्य माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून राजस्व अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना सेवा द्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासकीय सेवा आपल्या गावी’ उपक्रमाची जिल्हास्तरीय सुरुवात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पत्र/लाभ देऊन करण्यात आली. महाराजस्व अभियानांतर्गत तिसंगी, निवडे, वेतवडे, साळवन या चार ग्रामपंचायती करिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. असाच कार्यक्रम भविष्यात इतर ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अमित माळी, सुशांत बनसोडे, तहसीलदार संगमेश कोडे, रमेश शेंडगे यांच्यासह महसूल व अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यात महाराजस्व स्वाभियानाची सुरुवात गगनबावडा सारख्या दुर्गम तालुक्यातून करण्यात येत आहे. महसूल विभागासह अन्य विविध विभागांशी संबंधित नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. तिसंगीसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनीही या अभियानाचा लाभ घ्यावा.
कोरोना परिस्थितीमध्ये महसूल, आरोग्य, पोलीस विभागासह अन्य शासकीयत विभागांनी चोख काम केले असून या कालावधीत शासकीय यंत्रणेचे काम कौतुकास्पद झाले आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातूनही शासकीय विभागांनी अधिकाधिक नागरिकांना सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, गगनबावडा तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. धामणी खोऱ्याच्या कामाबरोबरच या भागातील रस्त्यांचे बांधकाम व अन्य प्रश्न सोडवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. हा तालुका कुपोषणमुक्त तालुका होण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी देखील उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शाहू महाराजांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं. खऱ्या अर्थाने विकासाचे कार्य राजांनी केले. त्यांना अभिवादन करण्यासाठी ६ मे या स्मृतिदिनी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून या राजाप्रति कृतज्ञता म्हणून अभिवादन करुया, असे आवाहन पालकमंत्री श्री पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, अभियानांतर्गत शिबिरासाठी संपूर्ण तालुकास्तरीय यंत्रणा तिसंगी गावात आली आहे. या भागातील नागरिक, महिला, विद्यार्थी यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. फेरफार दुरुस्ती, सातबारा नोंदी, सेतू सुविधा केंद्राशी संबंधित अर्ज या शिबिरामध्ये निकालात काढण्यात येतील. याशिवाय विविध विभागांचे प्रलंबित प्रश्नही मार्गी लावले जातील.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, गावातील वाद शिगेला पोहोचू नयेत, यासाठी प्रलंबित वादावर महसूल विभागाच्या समन्वयाने गाव चावडी सभा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे, यामुळे गावातील वाद गावातच मिटवण्यासाठी मदत होईल. अपर जिल्हाधिकारी किशोर पवार म्हणाले, सर्व विभागांशी समन्वय ठेवून नागरिकांची शासकीय कामे मार्गी लागण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोना परिस्थिती नंतर दोन वर्षांनी महाराजस्व अभियानाची सुरुवात गगनबावडा तालुक्यात पासून होत आहे.
महाराजस्व अभियानाबाबत-
महाराजस्व अभियानांतर्गत तिसंगी, निवडे, वेतवडे, साळवन या चार ग्रामपंचायती करिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. असाच कार्यक्रम भविष्यात इतर ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
या अभियान कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत नागरिकांची नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्त गट तपासणी अशा तपासण्या करुन ३०५ व्यक्तींना, वन विभागामार्फत ५ व्यक्तींना वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानी बाबत, २२९ व्यक्तींना आधार कार्ड मधील दुरुस्ती आणि मोबाईल लिंकिंग, नविन आधार कार्ड नोंदणीचा लाभ, सामाजिक वनीकरण तर्फे २८ कुटुंबाना, कन्या समृद्धी योजना, पशू वैद्यकीय विभागातर्फे जंत निर्मूलन अंतर्गत ७३ तर १०४ जनावरांच्या इतर तपासण्या करण्यात आल्या. कृषी विभागामार्फत ५० शेतकरी यांची महा डीबीटी अंतर्गत ऑनलाईन नोंदणी, ३ शेतकऱ्यांना औजारे व ट्रॅकटर वाटप, ५७ शेतकरी यांचे माती परीक्षण तर १० शेतकरी यांना औषध वाटप करण्यात आले. तहसील कार्यालयामार्फत २०४ कुटुंबांना रेशन कार्ड मधील दुरुस्ती, दुबार रेशन कार्ड व नविन कार्ड देणेत आले.६६ व्यक्तींना जात आणि उत्पन्न दाखले आणि १३ व्यक्तींना सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला. पंचायत समिती मार्फत ४ बचत गटांना कर्ज वाटप, ८ कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तर ५० व्यक्तींना नरेगा जॉब कार्ड देण्यात आले. पोस्ट ऑफिस मार्फत १२ कुटुंबांनी सुकन्या योजना, १ कुटुंबाने श्रम कार्ड, व १ कुटुंबाने ग्रामीण विमा योजने अंतर्गत नोंदणी केली. भूमी अभिलेख विभागामार्फत १४ व्यक्तींना कागदपत्रांच्या नक्कला पुरविण्यात आल्या. नरेगा अंतर्गत १२९ व्यक्तींनी नाडेप व शोष खड्डे बाबत कामाची मागणी नोंदविणेत आली.
अशा रीतीने मागील १० दिवसात घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेऊन कागदपत्रे गोळा करून हा लाभ आज शिबिराच्या वेळी १ हजार २७१ व्यक्तींना देण्यात आला. या शिवाय आज ६६४ व्यक्तींनी विविध योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली आहे. त्यांना सुद्धा लाभ देण्यात येणार आहे.