Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५ : सत्ता हे साध्य नव्हे; गोरगरिबांच्या कल्याणाचे ते साधन आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सत्ता ही गोरगरिबांसाठीच असते. तिचा लाभ त्यांच्या पदरात पडण्यासाठी हाडाची काडंआणि रक्ताचे पाणी करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
कागलमध्ये राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात निराधार योजनेच्या १५० लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे वाटप कार्यक्रमात हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कागल तालुका निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने होते.
येत्या काळात या योजनेची उत्पन्न मर्यादेची अट २० हजारावरून तीस हजार रुपये करणे, उत्पन्नाचा दाखला वर्षाला देण्याऐवजी तीन वर्षांनी देणे, लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची झाल्यानंतर लाभ बंद होण्याची तरतूद काढून टाकणे, तसेच महिन्याला एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार करणे यासाठी प्रयत्न करणार आहोत. याआधीच्या भाजप सरकारच्या काळात तालुक्यात केवळ साडेसातशे पेन्शन लाभार्थी झाले. गेल्या दीड वर्षात प्रताप उर्फ भैया माने यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल साडेचार हजार लाभार्थी झाले. या समितीचे काम राज्यात सर्वोत्कृष्ट आहे, हे असेही ते म्हणाले.
“त्याना जनताच आडवी करेल……”
हसन मुश्रीफ म्हणाले, सात वर्षांपूर्वी निराधार योजनेची लाभार्थी ही माझी व्होट बँक आहे, असे समजून विरोधकांनी त्यावर तक्रारी केल्या. त्यामुळे साडेचार हजारावर लोकांच्या पेन्शन बंद झाल्या. वृध्दापकाळात त्यांना अनंत अडचणी सोसाव्या लागल्या. यातून तुम्ही काय साधले? असा सवाल विचारताना ते म्हणाले गोरगरिबांच्या कामात जो आडवा येईल त्याला जनताच आडवी करेल.
रमेश माळी, शशिकांत खोत, राजू आमते, सदाशिव तुकान, बाळासाहेब दाईंगडे, नितीन दिंडे, प्रमोद पाटील, असलम काझी, सुनील माळी, प्रवीण काळबर, अमित पिष्टे, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.