Getting your Trinity Audio player ready...
|
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. आता शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका या आता २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करून आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत होते. त्यातून प्रभाग पद्धतीवरून या तिनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं दिसत होतं. त्यामुळे अंतिम निर्णय होत नव्हता. मात्र अखेर भाजपला कोंडीत पकडण्यासाठी प्रभाग रचना महाविकास आघाडी सरकारने केली होती. त्याला आता शिंदे-फडणवीस सरकार ब्रेक लावून नवीन प्रभाग रचना जाहीर केली आहे. २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सरकारने पुणे व अन्यत्र ३ सदस्यांचा प्रभाग असावा, असा निर्णय केला व त्यानुसार रचना केली. सदर रचना करताना अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांना सोयीची रचना केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या व अनेक नागरिकांनी कोर्टात देखील धाव घेतली होती. भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून प्रभाग रचना बदलण्याची मागणी केली होती.