Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर – शहरातील खड्ड्यात गेलेले रस्तेही तातडीने दुरुस्त होणे आवश्यक आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यातील खड्ड्यांत केवळ मुरूम टाकून “चलती का नाम गाडी’ असे धोरण महापालिकेने अवलंबले. मात्र, आता तरी खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होणार काय ? महापालिकेत अन्य विषयांवर आवाज उठविणारे नगरसेवक नागरिकांसाठी, वाहनधारकांसाठी रस्ते दुरुस्ती, नूतनीकरणासाठी प्रयत्न करणार काय ?
शहरातील सुतारवाडा भागातील मुख्य रस्ता खाली दबला गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. कोल्हापूर कडून रत्नागिरी कडे जाणार हा मुख्य मार्ग असल्याने नेहमीच वाहतुकीची गर्दी असते. मुख्य रस्ता खाली दबला गेल्याने २/३ वेळा तिथं अपघात देखील झाला आहे. त्यामुळे भागातील नागरीक आणि वाहनधारकांसाठी डोकेदुखीच ठरत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे म्हणजे “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ अशी स्थिती आहे.
ऐन गणपतीच्या काळात कोणती मोठी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन याचे काम पूर्ण केले पाहिजे अशी भागातील लोकांची मागणी आहे.या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण गरजेचे आहे. रस्त्याच्या मध्यभागी खड्डा असल्याने मोटारचालकांना खड्डे चुकविण्याचाही अंदाज येत नाही,
गणेशोत्सवात हा रस्ता दुरुस्त होणे अपेक्षित आहे कारण सुतारवाडा परिसरात असणारे भगवा ग्रूप मित्र मंडळ चे गणपतीचे मंडप मुख्य रस्त्याला लागून असते. खड्ड्याच्या अंदाज चुकून अथवा मोटार गाडी ट्रक बस यांचा खड्ड्यामुळे एकबजुला तोल जाऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याला जबाबदार कोण ?
हजारो वाहनधारकांसाठी हा रस्ता तातडीने दुरुस्त केला पाहिजे. तीन-चार महिने नागरिकांनी, वाहनधारकांनी बराच मनःस्ताप सहन केला आहे. आता उद्रेक होण्याची वाट महापालिका प्रशासनाने न पाहताच तातडीने याची दखल घेणे आवश्यक आहे.