Getting your Trinity Audio player ready...
|
MEDIA CONTROL ONLINE
बर्मिंगहम : भारताच्या महिला संघाने दमदार कामगिरी करत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. भारताने आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडवर दमदार विजय साकारला आणि त्यांनी अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करतना इंग्लंडला १६० धावा करता आल्या आणि भारताने चार धावांनी विजय साकारला. त्यामुळे आता भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकण्याची नामी संधी असेल.
भारताची युवा आणि तडफदार सलामीवीर समृती मानधनाने हा सामना चांगलाच गाजवला. कारण स्मृतीने या सामन्याची धडाकेबाज सुरुवात भारताला करून दिली. सुरुवातीपासूनच स्मृतीने इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली होती. शेफाली वर्मा ही तुफानी फटकेबाजीसाठी ओळखली जाते. पण यावेळी शेफालीपेक्षा स्मृती ही वादळी फटकेबाजी करत होती. स्मृतीने या सामन्यात ३२ चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६१ धावांची धमाकेदार खेळी साकारली आणि भारताला दमदार सुरुवात करून दिली. स्मृतीच्या या भन्नाट खेळीमुळेच भारताला १०च्या सरासरीने सुरुवात करता आली होती.
स्मृती बाद झाली असली तरी त्यानंतर भारताने धावांचा ओघ कायम ठेवला तो जेमिमा रॉड्रिगेझमुळे. कारण त्यानंतर जेमिमाने भारतीय संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि लौकिकाला साजेशी दमदार फलंदाजी केली. जेमिमाने यावेळी ३१ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर नाबाद ४४ धावा केल्या. जेमिमाला यावेळी हरसमनप्रीत कौर २० आणि दीप्ती शर्मा यांनी चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा करता आल्या.
भारताच्या १६५ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात आश्वासक झाली नाही. भारताच्या स्नेह राणाने यावेळी दोन तर दीप्ती शर्माने एक विकेट मिळवली. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताने यावेळी तीन विकेट्स या धावचीत करत मिळवल्या. त्यामुळे भारताने या सामन्यात फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच नाही तर क्षेत्ररक्षणही उत्तम केल्याचे पाहायला मिळाले.