Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर-दि.६ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत ७५ हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने शाळांमध्ये विविध स्पर्धा, बचत गट मेळावे, व्याख्यानमाला, स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून स्वातंत्र्य सेनानी तसेच त्यांच्या कुटुंबियांना भेटीही देण्यात येणार आहेत.
केएमटी बसेसच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत विशेष संदेश देणारी चित्रे प्रसिध्द केली जात आहेत. बचतगटाच्या माध्यमातून शहरात तिरंगा राखी स्टॉल द्वारे घरोघरी तिरंगा उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा अभियानंतर्गत विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला असून शहरातील अधिकाधिक घरांवर तिरंगा लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
जास्तीत जास्त नागरिकांनी घरोघरी तिरंगा उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा. या अभियानाच्या अनुषंगाने काही नाविन्यपूर्ण संकल्पना असल्यास सामाजिक संस्था व नागरिकांनी महानगरपालिकेच्या उपायुक्त-२ शिल्पा दरेकर अथवा जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी यांच्याकडे कळवाव्यात, जेणेकरुन आपल्या संकल्पनांचा समावेश या अभियानात करता येईल, असेही आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.