मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – भिमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एस.आय.टी.बाबत राज्य सरकारच्या निर्णयाचे आंबेडकरी जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चा, महाराष्ट्रचे पक्षनेता राहुल डंबाळे यांनी पुण्यात आज (मंगळवार, दि. 28 जानेवारी 2020) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राहुल डंबाळे यांनी सांगितले कि, १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी अटक करण्यामध्ये अद्यापपर्यंत जिल्हा पोलीस यंत्रणेला अपयश आले असून केवळ मागील सरकारने तपास प्रभावीत केल्याने संभाजी भिडेसह इतर फरार १४०० आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. त्यामुळे घटनेच्या मुळाशी जाऊन भिमा कोरेगाव हल्ल्यातील भगव्या दहशतवादीच्या अन्य सरकारमध्ये बसलेल्या मास्टर माइंडपर्यंत पोहोचणे अशक्यप्राय झाले होते. परंतु शरद पवार यांच्या सूचना व मागणीनुसार विद्यमान सरकारने भिमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एस.आय.टी. स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून त्याचे आंबेडकरी जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे.
तसेच राज्य सरकारने एस.आय.टी.ची भूमिका घेतल्यानंतर भिमा कोरेगाव हल्ल्याला मदत करणाऱ्या भाजप सरकारमधील मंत्र्यांचे चेहरे समोर येऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने चुकीचा हस्तक्षेप करुन याप्रकरणी एन.आय.ए मार्फत तपास करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा तिव्र निषेध राज्यातील आंबेडकरी जनता करीत आहे. कारण, एन.आय.ए. ची भूमिका ही कायमच संशयास्पद आणि भगव्या दहशतवादाला समर्थनीय राहिलेली असून याबाबतचा आरोप मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह यांना सहयोग व्हावा, म्हणून एन.आय.ए.चे अधिकारी याप्रकरणी आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप विशेष सरकारी वकिल रोहीणी सालियान यांनी यापूर्वीच केलेला आहे.
तसेच एल्गारप्रकरणी दाखल गुन्हयाचा तपास हा पुणे पोलीसां मार्फत झाला असला तरी त्यावरील संपूर्ण नियंत्रण व मार्गदर्शन हे एन.आय.ए अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच झाले असल्याने पुन्हा तोच फार्स कशासाठी हा प्रश्न उपस्थित राहात आहे.
भिमा कोरेगाव हल्लाप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका ही अगदी पहिल्या दिवसापासूनच आंबेडकरी जनभावने समवेत असून १ जानेवारी २०१८ रोजीच त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवून यात उजव्या विचारसरणीचे लोक असून त्यांना अटक झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. तसेच फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांचे पक्षाचे वतीने राज्यभर करण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेत शेतकरी आत्महत्येसमवेत भिमा कोरेगावप्रकरणी आरोपींच्या अटकेचा विषय त्यांनी लावून धरला होता.
तसेच त्यांनी स्वतः पुढाकार घेवून भिमाकोरेगाव न्यायालयीन चौकशी आयोगा समोर आपले लेखी म्हणणे सादर केलेले आहे. तसेच त्यांचे पक्षाचे आमदारांना याप्रकरणी विधिमंडळात आवाज उठविण्यास सांगीतले होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत मिमाकोरेगाव हल्ल्यातील आरोपींना अटक होवून आंबेडकरी जनतेला न्याय मिळावा, अशी भूमिका शरद पवार यांनी सातत्याने मांडली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण भूमिकेबद्दल आंबेडकरी जनता त्यांच्याबद्दल आदर बाळगून आहे.
भिमा कोरेगाव हल्ल्यानंतर आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी याप्रश्नी किमान समान भूमिका असणाऱ्या दलितेतर राजकिय पक्ष संघटनांना समवेत घेवून व्यापक लढा उभारण्याची जबाबदारी असतानाही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रश्नाला केवळ राजकिय भुमिकेतून पाहिले व हाताळल्यामुळे हा लढा संकुचित झालेला आहे. तसेच शरद पवार व काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय व राज्य पातळीवर संसद ते विधान भवन येथे भिमाकोरेगाव विषयी प्रामाणिकपणे लढलेला असताना देखील त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे.
दरम्यान, या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजीमंत्री चंद्रकांतजी हांडोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांची व गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत.दरम्यान, भिमा कोरेगाव हल्ल्या विषयी नेमकी वस्तुस्थिती सांगणारे पुस्तक रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे, असेही रिपब्लिकन युवा मोर्चा, महाराष्ट्रचे पक्षनेता राहुल डंबाळे यांनी सांगितले आहे.