रत्नागिरी: तेजस ठाकरे यांचा राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही. आतापर्यंत तेजस ठाकरे जंगलात पाल, सरडे शोधत फिरायचे. त्यांना जे काही मिळाले आहे ते केवळ ठाकरे या आडनावाच्या पुण्याईमुळे मिळाले आहे, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आज त्यांचा वाढदिवस असून त्याप्रसंगी एखादी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच निलेश राणे यांनी त्यांच्यावर जळजळीत शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
तेजस ठाकरे हे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले आहेत. ठाकरे कुटुंब सगळी महत्त्वाची पदं स्वत:च्या कुटुंबातच ठेवते, त्यांना तिकडे बाहेरचा चालत नाही. बाकीच्यांनी फक्त खुर्चा टेबल उचलायचं काम करायचं. व्यक्ती कितीही शेंबडा असला तरी आडनाव ‘ठाकरे’ असेल तरच तो मुख्य पदावर दिसेल, असे निलेश राणे यांनी म्हटले.