Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : थोर स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांची जन्मशताब्दी सामाजिक व वैचारिक उत्सव म्हणून साजरी करूया, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. समाजात ढासळतच चाललेल्या नीतिमूल्यांच्या जपणूकीसाठी गांधीवादी विचारांची गरज असल्याचेही ते म्हणाले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
आमदार हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात दौलतराव निकम यांनी आदर्शवत व त्यागी वृत्तीने कार्य केले. त्यांचा आदर्श समाजासमोर कायम रहावा यासाठी कागल शहरात त्यांचा भव्य पुतळा उभारू. तसेच त्यांच्या जन्मगावी त्यांच्या नावे स्वागत कमान उभारण्यात पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, दौलतराव निकम हा बेदाग हिरा आहे. ते राजकीय व सामाजिक जीवन प्रामाणिकपणाने जगले. समाजहितासाठी आजच्या राज्यकर्ते व तरुणांच्यासाठी गांधीवादी विचार जोपासण्याची गरज असून त्याच्या प्रसारास प्राधान्य देण्याची गरज आहे.
“नियोजन वर्षभराचे……”
ज्येष्ठ व थोर स्वातंत्र्यसेनानी तसेच कागल तालुक्याचे माजी आमदार दौलतराव निकम यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त वर्षभरात रक्तदान शिबीर, पशुवैद्यकीय शिबीर, रोगनिदान शिबीर, व्याख्याने, विविध स्पर्धा, स्मरणिका प्रकाशन व मुख्य सांगता समारंभ अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीस सरपंच पूजा मोरे, उपसरपंच मंगल कोकणे, अध्यक्षा सुनंदा निकम, यशवंतराव निकम, एम. बी. पाटील, कृष्णात मेटील, राहुल महाडिक (सिद्धनेर्ली), शाहूचे संचालक सचिन मगदूम, भाऊसाहेब कांबळे (केंबळी), संजय नरके (नंदगाव), सदाशिव चौगुले (पिंपळगाव खुर्द), नारायणराव जाधव (पाडळी खुर्द), गणपतराव जाधव (कोल्हापूर), उमेश माळी (कसबा सांगाव), नंदकुमार कांबळे (एकोंडी), दिनकर घराळ (कोगील बुद्रुक) यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.