Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापुर : लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त लोकराजा ऊर्जामैत्री परिवार कोल्हापूर तसेच मुक्तबंध विचारमंच कागल यांच्या तर्फे ‘काव्यांगण’ हे राज्यस्तरीय कविसंमेलन शाहू स्मारक भवन येथे पार पडले. कधी प्रिय व्यक्तीविषयीची निखळ-तरल भावना, तर कधी खट्याळ अवखळपणा… कधी महापुरुषांच्या कर्तृत्वाची प्रेरणा, तर कधी आई वडिलांच्या कष्टाविषयीची कृतज्ञता. मधूनच शेतीपासून ते राजकीय घडामोडींवर मार्मिक भाष्य… अशा वैविध्यपूर्णतेने नटलेल्या बहारदार कविता सादर करीत राज्यभरातील कवींनी उपस्थितांना थक्क केले.राज्यभर आपल्या कवितेमधून प्रसिद्ध झालेले अनंत राऊत (अकोला), विश्वास पाटील (राधानगरी), डॉ. स्वप्नील चौधरी (औरंगाबाद) शेखर चोरगे (पुणे), रोहिणी कदम (मुंबई), अजय त्रिभुवन (औरंगाबाद), सारंग पापटवार (नांदेड) यांनी प्रेम मैत्री सह अनेक सामजिक राजकिय भावनिक कवितांचे सादरिकरण केले.
तत्पूर्वी ॲडव्होकेट सी. बी. कोरे, उद्योजक जितू पाटील, अविनाश जाधव, प्रा. चंद्रशेखर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली देत या संमेलनाचे उद्घाटन झाले.
रोहित शिंगे यांनी आपल्या दिलखुलास आणि खुमासदार शैलीत सूत्रसंचलन केले तसेच प्रत्येक कवितेचा अर्थ त्यांनी आपल्या भाषेत समजून सांगत होते.वऱ्हाडी भाषेचा लहेजा असलेल्या कवी अनंत राऊत यांनी मानवी जगण्याची कविता सादर करीत,संमेलनाची सुरुवात केली. ‘कवितेमधून तुम्हा काळीज वाटतो मी, वरचा समाज शिवण्यासाठी आतून फाटतो मी….. अशी गेय कविता सादर करीत मैफलीत रंग भरले. त्याबरोबर आई-वडिलांचे कष्ट, मुलांचे भावनिक विश्व असे पैलू सांगणाऱ्या अनेक सुरेल कवितांचे त्यांनी सादरीकरण केले. त्यापाठोपाठ शेखर चोरगे यांनीआपल्या कावितेमधून प्रेमाचा भाव व्यक्त केला. त्यांनी तुझ्या इतकीच मुलाला जीव लावीन, त्याला आईची उणीव भासू देणार नाही अशा प्रेमळ कविता सादर केल्या.
त्यापाठोपाठ डॉ. स्वप्नील चौधरी यांनी दंगल समजून घेताना’ या कवितेमधून बुद्धीला गंज लागलेले लोक दंगलीत सहभागी होणारे गट, द्वेषाचे राजकारण आणि दुखावले जाणारे समूह असे अनेक पैलू या कवितेतून सांगत संमेलना मध्ये अनेक रंग भरले.
यानंतर रोहिणी कदम,अजय त्रिभुवन, सारंग पापटवार यांनी,प्रेम मैत्री नातं आशा प्रिय व्यक्तीच्या आठवणी, निसर्ग, समाज व महापुरुषांनी दिलेली शिकवण अशा कविता सादर करत सर्वांची मने जिंकून घेतली.कवी विश्वास पाटील यांनी गझल सादर करीत उपस्थितांचे खुपचं मनोरंजन केले.
या संमेलनाच्या समारोप मध्ये सर्वांना खुपचं सुंदर अनुभव अनुभवायला मिळाला. कवी अनंत राऊत हे “”मित्र गारव्यासारखा”” हि कविता सादर करत असताना ज्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या उर्जमैत्री ग्रुप मधील दोन मित्र एका गैरसमजामुळे गेली तीन वर्ष बोलत नव्हते कवी अनंत यांची कविता इतकी भावनिक झाली की ते दोघे सुरू आसलेल्या कार्यक्रम मध्ये पुन्हा एकत्र आले. हे पाहून कवी अनंत राऊत म्हणाले की आज माझी कविता जिंकली….!