Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/महागाव : संपूर्ण कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता ८० टक्क्यांहून अधिक मतदान श्री. छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीला होईल. त्यामुळे; आमच्याच आघाडीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास डाॅ. प्रकाश शहापूरकर यांनी व्यक्त केला. महागाव ता. गडहिंग्लज येथे श्री. छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर होत्या. भाषणात डाॅ. शहापूरकर पुढे म्हणाले, या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह कामगारांच्या आयुष्याची विस्कटलेली घडी बसवायची आहे. इथेनॉल प्रकल्प, सहवीज प्रकल्प उभारणार. विस्तारीकरणासह आधुनिकीकरणही करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.गोपाळराव पाटील म्हणाले, आमदार राजेश पाटील हे ढोंगी आहेत या ढोंगी आमदारापासून सावध रहा.
निंदानालस्ती व शिव्या त्यांनाच लखलाभ…..
डॉ. शहापूरकर म्हणाले, या प्रचाराचे आज माझे शेवटचे भाषण आहे. कोणावरही टीकाटिपणी आरोप -प्रत्यारोप करणार नाही. शेतकरी सभासदांचा कौल आमच्या पॅनेलला आहे. त्यामुळे विरोधक जी निंदानालस्ती करीत आहेत, शिव्या- शाप देत आहेत, हे सगळं त्यांनाच लखलाभ होवो.
यावेळी माजी आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर, शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्याणवर, विनायक उर्फ अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर, सोमगोंडा आरबोळे, प्रा. किसनराव कुराडे, ॲड. हेमंत कोलेकर, उदयराव जोशी, सतीश पाटील, कल्लाप्पा भोगण, भाई पताडे, सरपंच सौ. ज्योत्स्ना पताडे यांचीही भाषणे झाली.