Getting your Trinity Audio player ready...
|
मुंबई: राज्यातील राजकिय संघर्ष टोकाला गेला असताना दुसरीकडे सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने , गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासंबंधी उल्लेख केला आहे. यामुळे लांबलेल्या निवडणुका होण्याची दात शक्यता आहे. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समित्यांची मुदत संपलेली आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनेनुसार आता मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
“सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक, पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी एक जुलै २०२३ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या वापरण्यात येतील असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.” राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी यासंबंधी अधिसूचित केले आहे. राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार हे अधिसूचित करण्यात येत असल्याचे उपसचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे.
दरम्यान सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ मध्ये कोणकोणत्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद, नगरपंचायतीेंच्या निवडणुका घेण्यात येतील याचा या पत्रात उल्लेख नाही. मात्र राज्यात ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपलेली आहे. सध्या या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे