युवा पत्रकार संघातर्फे “इको फ्रेंडली” कोरडी रंगपंचमी उत्साहात साजरी.

 

कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी.

मार्च महिन्यातच कडक ऊन्हाच्या झळांनी नागरिकांना हैराण केले आहे. पुढे येणारा एप्रिल व मे महिन्यात याची आणखी तीव्रता वाढणार आहे. भविष्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर आत्तापासून उपायोजना करणे महत्त्वाचे बनले आहे. यासाठी युवा पत्रकार संघातर्फे “इको फ्रेंडली” रंगोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. त्यानुसार यंदाच्या रंगोत्सवामध्ये पाण्याचा वापर न करता “जल है.. तो जीवन है…” असा संदेश देण्यात आला. नैसर्गिक रंगांचा वापर करून “कोरडी रंगपंचमी” सण उत्साहात साजरा करण्यात आला.

Advertisements

गेल्या अनेक वर्षापासूनची झोपासली परंपरा..

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यचे मुख्य कार्यालय शाहूपुरी येथे शनिवारी (दि.३० मार्च) सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत नैसर्गिक कलरचा वापर करून कोरडी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यच्या डिजिटल फलकावर “जल हे तो जीवन है..” पाण्याचे संवर्धन करा.. पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करा.. असा संदेश देत जनजागृती करण्यात आली. युवा पत्रकार संघातर्फे दरवर्षी रंगोत्सवामध्ये समाज प्रबोधनपर संदेश देण्यात येतो. ही परंपरा यंदाच्या वर्षीही कायम राखत “पाणी वाचवा” चा संदेश रंगपंचमीच्या उत्सवात देण्यात आला. रंगोत्सवानिमित्त कॅराओके गाण्यांच्या सादरीकरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद..

या उपक्रमात सहभागी होऊन बी न्यूजचे मुख्य बातमीदार प्रमोद व्हनगुत्ते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, खरोखरच युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून समाज प्रबोधनात्मक अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असतात. तसेच पत्रकारांच्या अडीअडचणी व पत्रकार हिताचे उपक्रम राबवतात. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. पुढे ते म्हणाले, पत्रकार हे समाजातील उपेक्षित घटकांना आपल्या परखड लेखणीच्या आधारे न्याय मिळवून देण्याचे कार्य करत असतात. शासन व सर्वसामान्यांच्यामधील दूरी कमी करण्याचे काम प्रामुख्याने पत्रकार करत असतो. समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी झटणारे अनेक संघटना आहेत. त्यापैकी एक युवा पत्रकार संघ असून त्यांच्या सर्व कार्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याबद्दल मला विशेष आनंद आहे. भविष्यात युवा पत्रकार संघटना शिखर संस्था म्हणून नावलौकिक मिळवेल., अशी आशा मी व्यक्त करतो. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छाे देतो. असे सांगितले.

ग्रामीण, श्रमिक पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघ कार्यरत..

यानंतर बोलताना वरीष्ठ पत्रकार नंदकुमार तेली यांनी युवा पत्रकार संघाचे या “इको फ्रेंडली रंगपंचमी” उपक्रम कौतुककास्पद आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक श्रमिक पत्रकारांचे जीवन एकदम हालाखीचे असून अत्यल्प, तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना नेहमीच कार्यरत असल्याचे सांगितले.

यंदाच्या वर्षी “पाणी वाचवा” चा संदेश..

यानंतर बोलताना युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे म्हणाले, प्रतिवर्षी युवा पत्रकार संघातर्फे इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात येते. यंदाच्या रंगपंचमी उत्सवात “पाणी वाचवा” चा संदेश देण्यात आला असून कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली. भविष्यात होणारी पाणी टंचाई ओळखून भविष्यातील पिढीला पाणीटंचाईच्या प्रसंगाला सामोरे जावे लागू नये यासाठी यंदाच्या वर्षी “पाणी वाचवा” चा संदेश देत नैसर्गिक रंगांची उधळण करत कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली. पुढे ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी राधानगरी धरण बांधले. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, कळंबा तलाव, राजाराम तलाव या प्रामुख्याने तलाव असून आपल्याला कधीच पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. तरीसुद्धा पाण्याचे संवर्धन करुन पाण्याचे काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक बनले आहे.

रंगोत्सवात यांनी घेतला सहभाग..

यावेळी अमोल पोतदार, रतन हुलस्वार , जावेद देवडी, अक्षय थोरवत, नाझ आतार, अमर देसाई, शरद माळी, युवराज मोरे, नियाज जमादार, अजय शिंगे, कौतुक नागवेकर, विजय देसाई, प्रदीप चव्हाण, बाबुराव वळवडे, सतीश चव्हाण आदींसह हितचिंतक, परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *