Getting your Trinity Audio player ready...
|
सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. व गतवर्षी जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराच्या कारणेमीमांसा शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या वडनेरे समितीच्या अहवालावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
वडनेरे समितीने सादर केलेल्या महापुराबाबतच्या सादरीकरणात कृष्णा, कोयना, पंचगंगा, दुधगंगा या नद्यांच्या खोऱ्यांबाबत माहिती दिली. या नदी पात्रांमध्ये एकत्रित विसर्ग केल्यामुळे, खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे, धरणांमध्ये साठलेल्या गाळामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
येत्या काळात पूरस्थिती उद्भवू नये, म्हणून वडनेरे समितीने सुचवलेले सर्व उपाय योजना आणि स्थानिक तसेच प्रमुख लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना लक्षता घेऊन काम केले जाईल. दक्षता म्हणून एनडीआरएफची एक टीम १५ जुलैदरम्यान पूरभागात दाखल केली जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना.जयंत पाटील यांनी केले.
तसेच अलमट्टी धरणाबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करणार असून पुढील आठवड्यात कर्नाटकचे जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यात बैठक होणार असल्याचेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी बैठकीत सांगितले
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.