महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करणार- धनंजय महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : माजी खासदार धनंजय महाडिक यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत आज निवड झाली.
प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी ही निवड करतानाच, धनंजय महाडिक यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीचे मोठे जाळे आहे. ग्रामीण भागाचा अर्थकणा म्हणजे साखर कारखाने आहेत. अशावेळी धनंजय महाडिक यांना महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यासाठी संपर्क प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी दिली आहे.

Advertisements

सद्यस्थितीत साखर उद्योग विविध कारणांनी अडचणीत आला आहे. अशावेळी या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि नेमकी अडचण माहीत असणाऱ्या धनंजय महाडिक यांना भाजपने केंद्र सरकार आणि साखर उद्योग यामध्ये समन्वयक आणि संवाद दूत म्हणून जबाबदारी दिली आहे.

केंद्र सरकारने कारखान्यांसाठी घेतलेले निर्णय – नवं तंत्रज्ञान कारखानदारांपर्यंत पोचवणे, कारखान्यांच्या अडचणी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून त्यावर उपाय शोधणे, भाजपचा साखर कारखानदारांशी संपर्क वाढवणे, अशी जबाबदारी महाडिक यांच्यावर सोपवली आहे.
तसेच अडचणीतील साखर कारखान्यासाठी नवीन अभिनव योजना तयार करणे, यासाठी सुध्दा महाडिक काम करणार आहेत. राज्य स्तरावरील अत्यंत महत्वाच्या अशा क्षेत्रात काम करण्यासाठी धनंजय महाडिक यांची भाजपने निवड केली आहे.

राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांचे केंद्र सरकारच्या स्तरावरील प्रश्न सोडवुन , ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याचे धनंजय महाडिक यांनी म्हंटले आहे. अत्यंत विश्वासाने ही अतिरिक्त जबाबदारी देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाडिक यांनी आभार मानले असून, मिळालेल्या संधीचे सोने करून राज्यातील साखर उद्योगाला उर्जितावस्था आणण्या – साठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, असल्याचे श्री महाडिक यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *