Getting your Trinity Audio player ready...
|
मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : आतापर्यत झालेल्या पावसाची सरासरी पाहिली असता पुढील दोन महिने महापुर, अतिवृष्टी होण्याचा धोका जास्त आहे. जिल्ह्यात महापुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी यंदा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या यु बोटींचा वापर करण्यात येणार आहे. व २८० सुरक्षित स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच एनडीआरएफची तीन पथके तैणात केली असून आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री सतेज पाटील, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व डॉक्टर, परिचारिका यांनी चांगले काम केले आहे. ज्यांनी योगदान दिले त्यांच्या पाठीवर शाबासकी मिळावी म्हणून या योध्यांचा सत्कार करण्यात यावा, असे मला वाटते.
त्यासाठी पालकमंत्र्यांशी बोलणार आहे. कोविड-१९ मुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार उपलब्धतेनुसार होतील, मात्र कोविडमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लागणार नाही. कोविडसाठी जिल्हयाने ५ कोटीची मागणी केली होती. त्यातील ३ कोटी १५ लाख रुपये देण्यात आले आहेत.
महापूर व अतिवृष्टीमुळे गतवर्षी शेतकरी व इतर उद्योगधंद्याचे ४१ कोटी रुपयांचे झालेले नुकसानबाबत पंचनामे झाले असून, त्यामध्ये ज्यांना मदत मिळालेली नाही, त्यांना लवकरच देण्यात येईल.
कोल्हापूर जिल्ह्यासाठी ४० एचपीच्या ७० ते ८० नवीन बोटी देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ३०० मीटर पर्यंत महापुरात अडकलेल्या लोकांचा बचाव करण्यासाठी मानव विरहीत रिमोट कंट्रोलच्या बोटी मागवल्या आहेत. शासन जीवीतहानी व लोकांचे नुकसान रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. तसेच आपत्तीपासून बचाव करण्यासाठी गडहिग्लज तालुक्याने खूप चांगली खबरदारी घेतल्याचे ना.वडेट्टीवार यांनी सांगितले.
पावसाळ्यात विज पडून दरवर्षी किमान २५० ते ३०० लोकांचा मृत्यू होत असतो, हे टाळण्यासाठी राज्यातील २७ हजार गावात लायटिंग अरेस्टर यंत्र बसवण्यात येईल. त्यामुळे लोकांच्या व जनावरांच्या अंगावर विजा पडणार नाही. लवकरच त्या कामाला प्रारंभ होईल. घरांची पडझड अथवा नुकसान झाल्यास मिळणाऱ्या तुटपूंजी मदतीत वाढ करण्यात आली आहे, असेही ना. वडेट्टीवार म्हणाले.
तसेच कोकणात निसर्ग वादळाने ११०० गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याकरिता राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासकीय कार्यालय, शाळा, घरे, दुकाने अशा सर्वांना मदत करणार असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.
यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार संजीवबाबा आवळे, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रवक्ते संतोष लोंढे आदी मान्यवर पत्रकार परिषदेत उपस्थित होते .