Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १० बाय १० च्या मंडपासाठी कोणताही शुल्क आकारु नये , अशा सुचना महापौर निलोफर आजरेकर यांनी प्रशासनाला दिल्या.
पर्यावरणपुरक गणेशोत्सवाबाबत आज महापालिकेच्या स्थायी समिती मिटिंग हॉलमध्ये महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन, कोल्हापूर शहर नागरी कृती समितीची व कुंभार समाजाचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.
महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या, गणेश उत्सव २०२० सर्वांनी साधेपणाने साजरे करावे. सोशल डिस्टंन्स ठेवावे. गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर ठेवून गणेश उत्सव साजरा करावा. सार्वजनिक मंडळांनी वृक्षलागवड, रक्तदान शिबीर, पल्स ऑक्सीमिटर, थर्मामिटर, बेड्स, ऑक्सीजन किट्स, मास्क, सॅनिटाईजर अशा वस्तू देऊन विविध उपक्रमांनी गणेश उत्सव साजरा करावा.
सर्वांनी ४ ते ५ दिवस आधीपासून गणेश मुर्ती घेऊन जावाव्यात. महापालिकेचे हॉल कुंभार समाजाला मोफत दिले जातील. त्याठिकाणी कुंभार समाजाने विकेंद्रीत करुन गणेश मुर्ती विक्रीसाठी ठेवून होणारी गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे. गणेश उत्सव प्रमाणेच मोहरमसाठीही प्रशासनाने नियम व अटी घालाव्यात. यावर्षी बहुतांशी मंडळे वर्गणी मागणार नसलेने १० बाय १० च्या मांडवासाठी कोणताही परवाना शुल्क आकारु नये , असे आवाहन असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, कोव्हीड -१९ आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. शासन निर्देशाप्रमाणे यावर्षी गणेश उत्सव साजरा करुया. त्यामुळे आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधने आली आहेत. सर्वांनी मिळून सर्व मंडळांना आवाहन करुया, विविध सामाजिक उपक्रम राबवूया. रक्तदान शिबीर, झाडे लावणे, ऑक्सीमीटर देणे, व्हेंटिलीटर देणे असे विविध उपक्रम मंडळाने राबवावीत. यावर्षी जी मंडळे चांगले काम करतील त्यांचा गौरव करुया. बरीच सार्वजनिक मंडळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहींना काही वस्तू स्वरुपात देणार आहेत. यासाठी बरेचजणांचे फोन येत आहेत.
माजी महापौर आर के पोवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी काही मदत लागेल , ती सार्वजनिक मंडळे कार्यकर्त्यांनी करावी. पापाची तिकटी येथील राष्ट्रवादीचा स्वागत मंडप यावर्षी उभारला जाणार नाही. इतरांनीही स्वागत मंडप उभारु नयेत , असे आवाहन केले. यावर्षी साधेपणाने गणेशउत्सव साजरा करुया.
माजी नगरसेवक बाबा पार्टे म्हणाले, २१ ऑगस्ट रोजी मोहरम हा सण आहे. याबाबतचे नियम अद्याप आलेले नाहीत. याबाबत पोलिसांना मार्गदर्शन करावे. पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मंडळांची मिटींग घेऊन त्यांना कळवा. सार्वजनिक मंडळांनी आपआपल्या इच्छेने मदत करावी, यावर्षी कोणीही वर्गणी मागणार नाहीत. सार्वजनिक मंडळांना मंडप उभारण्यासाठी खड्डेची फि आकारली जाते ती माफ करावी.
दुर्गेश लिंग्रस यांनी राजारामपूरीत २०० ते २५० मंडळे आहेत. सर्व मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी शिवाजी तरुण मंडळाने २२ ऑगस्ट ला गणपती आणायचा व दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचा असे ठरविले आहे.
वसंतराव मुळीक यांनी मोहरम व गणपती उत्सव नियम सारखेच असतील. सर्वांनी जबाबदारी म्हणून गणपती आदल्या दिवशी आणावेत असे सांगितले.
मुतीकार मंडळाचे अध्यक्ष संभाजी माजगांवकर यांनी सर्व मंडळांना गणपती चार ते पाच कार्यकर्त्यांनी येऊन घेऊन जाण्यास सांगितले आहे. गर्दी कशी कमी करता येईल , याबाबत नियोजन केले आहे.
मुर्तीकार सर्जेराव निगवेकर यांनी सार्वजनिक मंडळांना व घरगुती गणपतींना बुकिंग करताना सर्वांना गणपती नेण्यासाठी तारखा दिल्या आहेत. दररोज ४ मंडळे बोलविले आहेत. त्याप्रमाणे श्रीची मुर्ती देत आहे. गर्दी न करणेबाबत सुचना दिल्या आहेत.
मुर्तीकार सेक्रेटरी अनिल निगवेकर यांनी मंडळांची मुर्ती ५ ते ६ व घरातील लहान मुर्ती ३ ते ४ दिवस अगोदर नेणेबाबत सुचना केल्या आहेत. यावर्षी मंडळांची संख्या कमी झालेने गणपती मागणी कमी आहे.
विरोधी पक्षनेता विजय सुर्यवंशी म्हणाले, कोव्हीड-१९ चे जगावरचे संकट देशावर व राज्यातून घरात कधी आले कळले नाही. प्रत्येक जण आपली जबाबदारी सांभाळून काम करत आहेत. मंडळांना परवानगी देताना परवानगी शुल्क न लावता महापालिकेने परवानगी देण्यात यावी. मिरवणूक व आगमनावेळी गर्दी सर्वांनी टाळावी. आपल्या मुर्ती मंडळातच विसर्जित करण्यात याव्यात. गणेशोत्सव पर्यावरण पुरक साजरा करुया. ८१ प्रभागात निश्चित केल्याप्रमाणे त्याच ठिकाणी मुर्ती विसर्जित कराव्यात.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, सभागृह नेता दिलीप पोवार, गटनेते सुनिल पाटील, सत्यजीत कदम, राहुल चव्हाण, शहर पोलिस उपअधिक्षक प्रेरणा कट्टे, पोलिस निरिक्षक शशिराज पाटोळे, सिताराम डुबल, एस.एल.कटकधोंड, अनिल गुर्जर, पी.व्ही. जाधव, अनिता मेणकर, प्रशासन अधिकारी शंकर यादव, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, रावसाहेब चव्हाण, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे, आश्पाक आजरेकर, अशोक पवार व रमेश मोरे आदी उपस्थित होते.