Getting your Trinity Audio player ready...
|
प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर
कोल्हापूर : कोव्हीड १९ महामारीच्या फैलावामुळे जगभरात हाहाकार उडाला आणि त्याला अटकाव घालण्यासाठी, लॉकडाऊन सारखे कटू निर्णय घ्यावे लागले. लॉकडाऊनचा फटका अर्थव्यवस्थेला बसणार हे स्पष्ट दिसत होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य घटकांसह सर्वच क्षेत्रांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देशाच्या जीडीपी च्या १० टक्के अर्थात २० लाख कोटी रूपयांचे आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले. विशेष म्हणजे त्याची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली. गृहिणी, शेतकरी, छोटे व्यावसायिक, फेरीवाले अशा सर्वच घटकांना संकटातून सावरण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. परिणामी देशाला महामारीची झळ तुलनेने कमी बसली आहे. देशवासियांसाठी सरकारी तिजोरी उघडण्यामध्ये भारत अग्रक्रमांकावर आहे. विविध मार्गानी शेवटच्या घटकापर्यंत मदत पोचली असल्याने, सर्वच घटक समाधानी आहेत. दुसरीकडे प्रभू श्रीराम यांच्या मंदिर निर्माणाचे कार्य सुरू केल्याने, देशातील सर्वच जनतेची मने मोदी यांनी जिंकली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियेतेचा विरोधकांनी धसका घेतला असून, विशेषत: कॉंग्रेस कार्यकर्ते गर्भगळीत झाले आहेत. म्हणूनच आत्मनिर्भर पॅकेजबाबत बालिश सवाल उपस्थित करून आंदोलन करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. पण पॅकेजबाबत सविस्तर माहितीचा फलकच लावला असल्याने, कॉंग्रेसच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे.
खरे पाहता, संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्हा कोव्हीडसाठी हॉटस्पॉट बनला आहे. या आजारामुळे जिल्हयात दररोज १५ ते २० जण मृत्यूमुखी पडत आहेत, तर दररोज बाधितांच्या संख्येत ५०० हून अधिकची भर पडत आहे. रूग्णांसाठी बेड नाही, आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असून, क्वारंटाईन सेंटर मध्ये ऑक्सिजनची कमतरता, जेवणात अळ्या, सुविधांचा वाणवा आहे. दरम्यान सकाळी पॉझिटिव्ह तर संध्याकाळी निगेटिव्ह रिपोर्ट अशी धांदलबाजी जिल्हयाने अनुभवली आहे. त्याचबरोबर वाढीव वीज बीलामुळे सर्वसामान्य हैराण आहे, वीज स्थीर आकारावरून उद्योजक संकटात आहे. त्याच वेळी मार्केट कमिटी मधील नोकरभरती घोटाळा, महापालिकेत घरफाळा घोटाळा पुढे आला आहे. या सर्व प्रश्नांवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून उत्तर दिले जात नाही. सर्वकाही अलबेल असल्याचा भास निर्माण करण्यात ते मश्गुल आहेत. म्हणूनच या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलनाचा फार्स करण्यात आला, अशी टिका महाडिक यांनी केली आहे.
एप्रिल महिन्यात जिल्हयात ५० पेक्षा कमी रूग्ण होते. ती संख्या आता १२ हजारच्या वर गेली आहे. निष्क्रीय आणि अपयशी पालकमंत्र्यांच्या कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची जनतेची भावना आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी, सतेज पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घ्यावे आणि धडाडीचे नेते, कामाचा अनुभव आणि मदत करण्याची इच्छा असणार्या हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी धनंजय महाडिक यांनी केली आहे.