Getting your Trinity Audio player ready...
|
प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर
गांधीनगर-चिंचवाड रस्त्यावर सतत होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे ग्रामस्थ, व्यापारी वर्ग व बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना त्याचा नाहक त्रास होत आहे.
चिंचवाड रोडवर वाहतूक व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सहाजिकच येथे चारचाकी मालवाहू वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ही वाहने उभी-आडवी कशीही लावली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. दुचाकीस्वारांना वाहन चालवणे कठीण बनते. चिंचवाडला ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांसह दुचाकीस्वारांना वाहतुकीच्या कोंडीतून बाहेर पडणे मुश्किल बनते. कोकण, कर्नाटकसह राज्याच्या विविध जिल्ह्यातील मालवाहू चारचाकी येथे येत असतात. त्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. वळीवडे कॉर्नर ते चिंचवाड रेल्वे फाटक हे अंतर साधारण एक किलोमीटर आहे. पण हे अंतर पार करण्यास दुचाकीला किमान अर्धा – पाऊण तास लागतो. एखाद्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात या रस्त्यावरून घेऊन जाणे अत्यंत कठीण बनते. याबाबत अनेक जणांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पोलिसांसमोर आपली कैफियत मांडली आहे. मात्र वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायम आहे. याबाबत त्वरेने लक्ष घालून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह ग्राहक वर्ग व वाहनचालकांकडून होत आहे.
तावडे हॉटेल ते गांधीनगर मुख्य बसथांबा या अंतरामध्ये बरेच वाहतूक पोलीस असतात. त्यातील काही पोलीस कर्मचारी चिंचवाड रस्त्यावर ठेवल्यास व योग्य नियोजन केल्यास वाहतूक सुरळीत होईल. गांधीनगर वाहतूक पोलिसांकडे क्रेन आहे; पण या भागात अपवादानेच क्रेन येत असते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक कोंडीची समस्या कायम आहे.असे
प्रतिक्रिया : रामभाऊ साळोखे ( वाहतूक सेना) आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
वळीवडे कॉर्नर ते चिंचवाड रेल्वे फाटक रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी नेहमीची डोकेदुखी ठरली आहे. याबाबत योग्य नियोजन करावयास हवे.