तावडे हॉटेल ते गांधीनगर चिंचवाड रेल्वे फाटक सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून बांधली गेलेली अवैध बांधकामे पाडण्यात आली.

सुलोचना नार्वेकर :प्रतिनिधी

तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटक या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करत हातोडा हाणला. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असणार्‍या दुकानदारांचे डिजिटल फलक ,पायऱ्यांची कठडे व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून बांधली गेलेली अवैध बांधकामे आज पाडण्यात आली ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून गांधीनगर ची ओळख आहे पण या व्यापारी पेठेच्या मुख्य रस्त्यावर अनेक जणांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद होत असून अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब ठरत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आणि ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मुख्य रस्त्याच्या अतिक्रमणाबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. गुरुवारी सकाळी साडे अकरा च्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचा फौजफाटा येऊन मुख्य रस्त्यावरील पानटपऱ्या, चहाची खोकी, तसेच व्यापाऱ्यांनी अतिक्रमीत केलेले गटारी वरील कठडे,डिजिटल फलक, लोखंडी कंपाऊंड, हे सर्व जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले यावेळी काही व्यापाऱ्यांच्या कडून त्याला विरोध झाल पण त्या विरोधाला न जुमानता सार्वजनिक विभागाने कारवाई सुरूच ठेवली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर यांनी या कारवाईवेळी मोठा पोलिस बंदोबस्त दिला होता. त्यामुळे या कारवाईला फारसा विरोध झाला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून जी बांधकामे सुरू होती ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडून टाकली. या कारवाईत सार्वजनिक विभागाचे श्रीकांत सुतार, संजय माळी ,शिवाजी पाटील ,वैभव कुंभार, व अन्य कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या कारवाईवेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चौकट-
कारवाईदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून जी बांधकामे सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई तर होईलच पण प्रसंगी फौजदारी गुन्हे ही दाखल करण्यात येणार आहेत. सध्या कविता शंकर पंजाबी व इतर तसेच गोपाल दर्यानी, मुकेश अहुजा व इतर यांच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच भविष्यात मुख्य रस्त्यावर अतिक्रमित बांधकामावर व न्यायालयाचा आदेश डावलणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

लॉक डाऊन च्या काळात अनेक जणांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून अवैध बांधकामे सुरू करून ती पूर्ण केली आहेत अशा अन्यजणावर कारवाई कधी होणार असा सवाल याचीका करता अंकुश वराळे व आरटीआय कार्यकर्ता अशोक चांदवानी यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *