पहिल्या कसोटीत भारताचा श्रीलंकेवर डावाने विजय…!

मोहाली : रविंद्र जडेजाच्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर भारताने मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पहिल्याच कसोटीत टीम इंडियाने विजय मिळवाल तर १००वी कसोटी खेळणाऱ्या माजी कर्णधार विराट कोहली याला विजयाची खास भेट देखील दिली.

पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव फक्त १७४ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन तर मोहम्मद शमीने १ विकेट घेतली. भारताकडे पहिल्या डावात ४०० धावांची आघाडी होती. त्यामुळे श्रीलंकेला फॉलोऑन देण्यात आला. पण दुसऱ्या डावात देखील श्रीलंकेला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. आर अश्विनने तिसऱ्या षटकात लंकेला पहिला धक्का दिला आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट पडत गेली. दुसऱ्या डावात विकेटकीपर निरोशन डिक्वेल्ला वगळता लंकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर अधिक वेळ थांबता आले नाही. डिक्वेल्लाने नाबाद ५१ धावा केल्या.

Advertisements

कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून पहिल्या डावात रविंद्र जडेजाने नाबाद १७५ धावा केल्या. तर विकेटकीपर ऋषभ पंत ९६, आर अश्विनने ६१ तर हनुमा विहारीने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. १००वी कसोटी खेळणाऱ्या विराट कोहलीला ४५ धावा करता आल्या. भारतावर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याची वेळ आली नाही त्यामुळे १००व्या कसोटीत शतक करण्याची विराटची संधी हुकली.

या सामन्यातील दुसऱ्या डावात भारताचा फिरकीपटू आर.अश्विनने श्रीलंकेच्या चरित असलंकाला बाद केले आणि कसोटी करिअरमधील ४३५वी विकेट घेतली. भारताकडून कसोटी सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने माजी कर्णधार कपिल देव यांचा ४३४ विकेटचा विक्रम मागे टाकला. दुसऱ्या डावात भारताकडून जडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी ४ तर शमीने २ विकेट घेतल्या. सामन्यात जडेजाने ९, तर अश्विनने ६ गडी बाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *