कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रशासनात वरिष्ठांची ‘कौतूकाची थाप’ कर्मचाऱ्यांना बळ देवून जात असते. जोतिबा देवस्थानच्या चैत्र यात्रेदरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्याची कामगिरी पार पाडली. या कामगिरीची दखल जिल्हाधिकारी मा.श्री.राहूल रेखावार यांनी घेतली. सुरळीत वीजेसाठी अहोरात्र कार्यक्षेत्रात राबणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना मा.जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार स्वीकारण्याचा बहुमान मिळाला. अन् वीज कर्मचारी भारावून गेले.
कोल्हापूरचे वीज कर्मचारी नेहमीच ‘फक्त लढ म्हणा’ या धीराचे आहेत.महापूर, कोरोनासारख्या आपत्तीतील कोल्हापूरच्या वीज कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. एखाद्या चांगल्या कामगिरीचे कौतुक झाले की, पुढची कामगिरी अधिक ताकदीने यशस्वी करण्याकडे कल वाढतो. याचाच प्रत्यय जोतिबा देवस्थानच्या चैत्र यात्रेदरम्यान आला. महिनाभरापासून जोतिबा यात्रेकरीता वीज यंत्रणेच्या देखभाल-दुरूस्तीसाठी वीज कर्मचा-यांनी मेहनत घेतली. जोतिबा यात्रेसाठी ४८ जणांचे वीज कर्मचारी पथक अहोरात्र तैनात होते. यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील लाखों भविक भक्त येणार असल्याने प्रशासनावर खुप मोठी जबाबदारी होती. त्यात वीजसेवा अत्यावश्यक असल्याने कसूर चालणार नव्हती. ही बाब ध्यानी ठेवून वीज कर्मचाऱ्यांनी अखंडित वीज सेवेची जबाबदारी पुर्ण केली.
यावेळी अधिक्षक अभियंता अंकुर कावळे उपस्थित होते. उपविभागीय अभियंता अमोल राजे, कनिष्ठ अभियंता राजश्री प्रभु, प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र पाटील, तंत्रज्ञ विनायक पाटील ,संदिप पाटील, श्रीकांत पाटील, बाह्यस्त्रोत वीज कर्मचारी विश्वास ढाकवी, ओमकार परिट, राकेश पाटील, केदार मगदूम,अजय गावडे , आशिष हिरवे यांचा प्रशस्तीपत्र व पुष्प देवून प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.